स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

मुंबई तक

04 Nov 2025 (अपडेटेड: 04 Nov 2025, 11:35 AM)

State Election Commission press conference : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

 State Election Commission press conference

State Election Commission press conference

Google CTA

बातम्या हायलाइट

point

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार?

point

राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

State Election Commission press conference :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेत नगरपरिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे या पत्रकार परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, तेच निवडणुकींच्या तारखांची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून, पत्रकार परिषद संपताच राज्यभर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात चांगलीच हालचाली निर्माण झाल्या आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्षांनीही आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली असून, उमेदवारांच्या याद्यांवर अंतिम निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : "तुझी होणारी बायको तर रात्रीच..." लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ येताच नवऱ्याला आला फोन अन् कुटुंबियांना कळताच...

मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान होईल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येतील. शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यात राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पार पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक टप्प्याची निवडणूक प्रक्रिया सुमारे 21 दिवसांची असेल, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यासोबतच निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान घेण्याचे नियोजन केले असल्याचे समजते. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाला मर्यादित वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेतला गेला आहे.

राज्यातील या निवडणुकांमध्ये एकूण 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महानगरपालिका सामाविष्ट आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागांत निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या निवडणुकांमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होणार असून, सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे आज दुपारी होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर बसले पण खुर्ची मोडली, बिहारमध्ये प्रचारादरम्यान काय घडलं?