Uddhav Thackeray Shiv Sainik dies after heart attack, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर सर्वत्र लावण्यात आले होते. ठाकरे गटाचे नेते रमेश तिखे यांनी हे पोस्टर लावले होते. याबाबत ठाकरे गटाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. दरम्यान याप्रकरणी ठाकरेंचे नेते रमेश तिखे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यासाठी कॉल केला होता. त्यामुळं तिखे यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
मधुर म्हात्रे हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात जात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यामुळे पोलीस त्यांना कॉल करत असल्याने रमेश तिखे यांच्यावर दबाव आला. दरम्यान, यामुळे त्यांना आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी निरीज दुबे यांनी केला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू पोलिसांच्या दबावाने झाल्याचा आरोप एसीपी कल्याणजी घेटे यांनी फेटाळून लावलाय. या प्रकरणी ठाकरे गटाकडून आज तक्रार देण्यात आली असून त्यावर तपास सुरु असल्याची माहितीही एसीपी घेटे यांनी दिली आहे.
अपहृत नगरसेवकांशी संपर्क होत नसल्याने शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या आदेशान्वये रविवारी कल्याण पूर्वेतील प्रत्येक चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि ॲड. किर्ती ढोणे हे दोघे बेपत्ता असल्याचे पोस्टर उबाठाच्यावतीने लावण्यात आले. यावेळी युवासेना शहरप्रमुख ॲड. नीरज कुमार, उपशहर प्रमुख हेमंत चौधरी, प्रकाश जाधव, शांताराम गुळवे, नितिन मोकल, अमित उगले, दत्ता पाखरे, प्रमोद परब, शशिकांत गायकर, रमेश तीखे आदींनी पुढाकार घेऊन पोस्टर्स सर्वत्र लावले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागताच त्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक बेपत्ता झाले आहेत. एकंदरी 16 जानेवारीपासून त्या नगरसेवकांच्या संपर्कात पक्षाचे नेते आणि पदाधिकारी वारंवार असतानाही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. हे बेपत्ता नगरसेवक सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वचे शहरप्रमुख शरद पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर या नगरसेवकांना व्हिप बजावून त्यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शहरप्रमुख पाटील यांनी यापूर्वीच मांडली आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार 25 जानेवारी रोजी दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर कारवाईसाठी पोलिसांनी वारंवार फोन करुन तिखेसह इतर कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे आणि पोलीस या मृत्यूला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











