Praful Patel on Piyush Goyal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीतील विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? पक्षाचं नेतृत्व कोण करणार? असे मोठे प्रश्न राष्ट्रवादीसमोर आहेत. अजित पवारांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झालीये. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे असा कोणताही निर्णय राष्ट्रवादीत झालेला नसताना पियुष गोयल यांनी असं वक्तव्य केलंय. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर समोर येऊन स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीये. पियुष गोयल यांनी काय म्हटलं होतं? आणि प्रफुल पटेल यांनी कोणतं स्पष्टीकरण दिलं? हे जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
पियुष गोयल नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, महाराष्ट्रातील महायुती सरकारचा भाग असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवार यांच्याकडे होते आणि आता सुनेत्रा पवारजी यांच्याकडे आहे." तसेच, प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत बोलताना पियुष गोयल म्हणाले, “मला वैयक्तिकरित्या असं होताना दिसत नाही. शरद पवार यांनी जनतेचा विश्वास गमावला असल्याने त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल, असं मला वाटत नाही,” असेही गोयल म्हणाले.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांची पक्षात अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली नसल्यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. अखेर प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलंय. प्रफुल्ल पटेल म्हणाले, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर माझी नियुक्ती झाल्याबाबत माध्यमांमध्ये काही बातम्या प्रसारित होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, हे मी ठामपणे स्पष्ट करू इच्छितो. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ही एक लोकशाही मूल्यांवर आधारित संघटना आहे. इतका महत्त्वाचा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदारांशी सल्लामसलत करून, समर्पित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा सन्मान राखूनच घेतला जातो. राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा बाबींमध्ये आम्ही निश्चित प्रक्रियेचे पालन करतो.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत काय म्हणाले होते?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
आमदार अमोल मिटकरी यांचंही भाष्य
"राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू आहे. अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अफवा पसरवणं हे राजकीय हेतूने केलं जात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
रुपाली ठोंबरेंचंही वादावर भाष्य
"श्रीमान पियुष गोयल हे माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वा सदस्य नाहीत. ते अशा पक्षाचे एक मोठे नेते आहेत जो पक्ष इतर पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष न देता स्वपक्ष वाढवतो. मा. अटलजी कडून ते काही शिकले नसावेत. अशा कठीण काळात निदान मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ यांनी जी सामंजस्याची भूमिका दाखवली तितकी जरी आत्मसात केली तरीही अजित दादांच्या सामान्य कार्यकर्त्याला समाधान वाटेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व अधिकार मा अजित दादा पवार नंतर मा सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे आहेत. ओ श्री. गोयलजी तुम्हाला कोणताच नैतिक व कायदेशीर अधिकार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बद्दल जाणीवपूर्क दिशाभूल करण्याचा नेरेटीव पसरवण्याचा. उगीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बद्दल वक्तव्य करू नये", असं रुपाली ठोंबर पाटील म्हणाल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अजितदादांच्या अपघाताचं कारण समोर येणार का? विमान प्राधिकरणाचे लोक घटनास्थळी पोहोचले; पाहा VIDEO
ADVERTISEMENT











