ADVERTISEMENT
Vidyanand Bapat Interview : मुंबई Tak च्या चावडीवर झालेल्या मुलाखतीत पुण्यातील जागृत नागरीक विद्यानंद बापट यांनी 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या उक्तीप्रमाणे डीजे बंदी, ध्वनिप्रदूषण आणि सण-उत्सवांच्या बदलत्या स्वरूपावर परखड भाष्य केले आहे. प्रत्येकाची मते वेगवेगळी असली तरी, डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आणि सार्वजनिक रस्त्यांवर होणाऱ्या अडथळ्यांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास होत असून, याविरोधात कायदेशीर आणि तार्किक लढा देण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Personal Finance: CTC मोठा, पण हातात पगार कमी! Salary Slip मधील हे आकडे समजून घ्या
'ध्वनिप्रदूषण आणि रहदारीचा अडथळा हा धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही'
सध्या सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली केले जाणारे ध्वनिप्रदूषण आणि रहदारीचा अडथळा हा कधीही धर्मस्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही, असे बापट यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत, इतर नागरिकांच्या शांततेत जगण्याच्या अधिकारावर गदा आणणारे वर्तन पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नागरिकांनी नागरी समस्यांवर उघडपणे आणि तार्किक भूमिकेतून बोलले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'कायद्याचे पालन दिखाव्यासाठी नसून त्याच्या मूळ उद्देशानुसार, स्पिरिटनुसार व्हावे'
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डीजे संस्कृतीमुळे निर्माण झालेला त्रास हा मानवनिर्मित असून तो पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासारखा आहे. ध्वनीक्षेपकांचा वापर बंदिस्त आणि साऊंडप्रूफ जागेतच मर्यादित ठेवल्यास उत्सवांचा आनंदही घेता येईल आणि कोणालाही त्रास होणार नाही, अशी विन-विन सिच्युएशन निर्माण होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कायद्याचे पालन हे केवळ दिखाव्यासाठी नसून त्याच्या मूळ उद्देशानुसार व स्पिरिटनुसार व्हायला हवे.
आपल्या विचारांमागे नास्तिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचे सांगत बापट यांनी तरुण वयापासूनच अंधश्रद्धा व चुकीच्या प्रथांविरोधात प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट केले. सण-उत्सव साजरे करण्याला आपला कसलाही विरोध नसून, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध आणि मानवी अधिकारांच्या रक्षणासाठी आपला हा विचारप्रवर्तक लढा असाच कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केला.
ADVERTISEMENT












