116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला

Vijay Thalapathy : तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा झाला असून, बहुमतासाठी आवश्यक 118 आमदारांचे समर्थन सिद्ध करण्यात अपयश आल्याने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पुन्हा परत पाठवले आहे.

Vijay Thalapathy

Vijay Thalapathy

मुंबई तक

09 May 2026 (अपडेटेड: 09 May 2026, 12:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा?

point

राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला

Vijay Thalapathy : तामिळनाडूमध्ये सुरु असलेला सत्तास्थापनेचा पेच संपूर्ण देशात चर्चिला जात असून सर्वांचे विजय मुख्यमंत्री होतात की नाही? याकडे लक्ष आहे. तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे अध्यक्ष विजय थलपती यांनी गेल्या तीन दिवसांत तिसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेऊनही त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे.  राज्यपालांची शुक्रवारी भेट घेऊन विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता, परंतु राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना पुन्हा एकदा बहुमताचा आकडा गाठण्यास सांगितले आहे.  234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. मात्र, राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांच्याकडे सध्या केवळ 117 आमदारांचेच समर्थन असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय यांच्या पक्षाने 108 जागा जिंकल्या असल्या तरी, त्यांनी दोनपैकी एक जागा रिक्त करणे अपेक्षित असल्याने त्यांच्या पक्षाचे प्रभावी संख्याबळ 107 इतके झाले असून, काँग्रेस, डावे पक्ष आणि एएमएमकेच्या पाठिंब्यावर ते सत्तास्थापनेचा प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक

एएमएमके आमदाराच्या सहीवरून नवा वाद

विजय यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता शपथविधीसाठी वेळ मागितली होती, परंतु एएमएमके (AMMK) सरचिटणीस टीटीव्ही दिनकरण यांच्या एका फोनमुळे सर्व गणिते बिघडली. विजय यांनी सादर केलेल्या पत्रात एएमएमकेच्या एकमेव आमदाराची स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप दिनकरण यांनी राज्यपालांकडे केला. त्यानंतर काही वेळातच एएमएमकेचे आमदार कामराज यांनी दिनकरण यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेऊन स्वतःच्या स्वाक्षरीचा इन्कार केला आणि टीव्हीके पक्षावर घोडेबाजाराचा आरोप केला. यामुळे विजय यांचे संख्याबळ 117 वरून 116 वर खाली आले, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा दोनने कमी होते. दरम्यान, टीव्हीकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून कामराज हे स्वतःहून विजय यांना समर्थन देणारे पत्र लिहित असल्याचा दावा केला असला, तरी या गोंधळामुळे राज्यपालांनी शपथविधीला हिरवा कंदील दिला नाही.

हेही वाचा : सातारा : मुलाकडून चुकून हॅन्डब्रेक निघाल्याने अपघात, एकाच कुटुंबातील चार महिलांचा दुर्दैवी अंत

व्हीसीके आणि आययुएमएलची भूमिका गुलदस्त्यात; 'व्हॉट्सॲप' राजकारणामुळे मित्रपक्ष नाराज

या राजकीय नाट्यात व्हीसीके (VCK) आणि आययुएमएल (IUML) या पक्षांच्या भूमिकेने अधिक सस्पेन्स निर्माण केला आहे. डीएमके आघाडीचा भाग असलेल्या व्हीसीकेने विजय यांना पाठिंबा दिल्याचा दावा फेटाळला असून, राज्यपालांना कोणतेही समर्थन पत्र मिळाले नसल्याचे राजभवनातून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, व्हीसीकेने विजय यांच्यावर 'अहंकारी' असल्याची टीका केली असून, नेतृत्वाशी वैयक्तिक संपर्क साधण्याऐवजी केवळ व्हॉट्सॲप मेसेजद्वारे पाठिंबा मागितल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दोन आमदार असलेल्या आययुएमएलनेही रात्री उशिरा स्पष्ट केले की, ते डीएमकेसोबतच ठाम असून विजय यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या सर्व घडामोडींमुळे विजय यांचे बहुमत पुन्हा एकदा संशयाच्या भोऱ्यात सापडले असून शनिवारी त्यांचा शपथविधी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यपालांचे विजय यांना निर्देश; 118 आमदारांच्या प्रत्यक्ष स्वाक्षऱ्यांनंतरच मिळणार आमंत्रण

राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जेव्हा ते 118 आमदारांच्या प्रत्यक्ष स्वाक्षऱ्यांचे पत्र घेऊन येतील, तेव्हाच त्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल. सध्याच्या परिस्थितीत विजय यांच्याकडे काँग्रेसचे 5, डाव्यांचे 4 आणि एएमएमकेचा 1 अशा आमदारांचा पाठिंबा असल्याचे मानले जात होते, परंतु स्वाक्षरीच्या वादामुळे हा आकडा 116 वर स्थिरावला आहे. जोपर्यंत विजय बहुमताचा जादूई आकडा पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत तामिळनाडूच्या सत्तेचा हा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. या अनिश्चिततेमुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून सर्वांचे लक्ष आता विजय यांच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.