
आई-वडील शेतात कामासाठी गेल्यानंतर खेळता-खेळता तोल घसरुन शेततळ्यात पडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. 9 मे रोजी मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे ही घटना घडली आहे.
विनायक भरत निकम (वय 12), सिद्धेश्वर भरत निकम (वय 8) आणि कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय 5) अशी या मृत चिमुरड्यांची नावं आहेत. मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भरत निकम हे शेत मजुरीसाठी शेटफळ येथील आपले मेहुणे मुकेश हिंगमिरे यांच्याकडे आले होते. मागील काही महिन्यांपासून शेटफळ येथील महेश तानाजी डोंगरे यांच्या शेतात भरत हे आपली पत्नी रेश्मासोबत काम करत होते.
9 मे रोजी आई-बाबा शेतात कामासाठी गेल्यानंतर तिन्ही भाऊ खेळत-खेळत दुपारी तीन वाजता संतोष डोंगरे यांच्या शेतातील शेततळ्यात पोहायला गेले. यावेळी तोल जाऊन तिन्ही भाऊ आत पडून त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी सहा वाजता आई-वडील कामावरुन घरी परतले असता त्यांना मुलं घरात न दिसल्यामुळे ते घाबरले. चौकशी करत-करत आई-वडील शेततळ्यापर्यंत पोहचले असताना त्यांना मुलांच्या चपला दिसल्या आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. कार्तिकचे वडील मुकेश यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.