Manoj Jarange : ‘त्यांना आवरा, नसता…’, जरांगेंनी भुजबळांविरुद्ध थोपटले दंड; शिंदे, फडणवीस, पवारांना काय दिला इशारा?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Manoj jarange patil targets Chhagan Bhujbal, warns eknath shinde, devendra fadnavis and ajit pawar.
Manoj jarange patil targets Chhagan Bhujbal, warns eknath shinde, devendra fadnavis and ajit pawar.
social share
google news

Manoj Jarange kolhapur Rally, Chhagan Bhujbal : अंबडमध्ये झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केलं. तू तर सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडतो, असं भुजबळ म्हणाले. त्याला मनोज जरांगे पाटलांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेतून उत्तर दिलं. महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा उल्लेख जरांगेंनी केला. त्याचबरोबर भुजबळांना शांत करा नसता… असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्भित इशारा दिला.

कोल्हापुरातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “या आरक्षणामुळे आपल्या पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. त्यांच्या मायबापांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. या आरक्षणामुळे आपल्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता एकजूट रहा. पुरावे असतानाही ते दाबून ठेवले. आता ते मिळालेत. सगळ्यांना माहिती झालंय. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार. मराठा ओबीसी आरक्षणात जाणार, हे शंभर टक्के सगळ्यांना माहिती झालंय. तेव्हापासून त्यांचा तिळपापड झालाय. त्या एका पठ्ठ्याला काही तर सुधरेना”, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला.

“छत्रपती शिवरायांच्या मावळा आहे. अंगात त्यांचंच रक्त खेळतंय. मी मराठ्याचा असल्याने त्यांना कुणाला भित नाही आणि भिणारही नाही. माझ्या जातीच्या न्यायाच्या आड जर कुणी आला, तर मी त्यांना सोडत नाही”, असं म्हटल्यावर उपस्थितांनी छगन भुजबळांच्या नावाने घोषणाबाजी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सासऱ्याची भाकर खातो, तुझी खातो का? तू तर…”

त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, “आता तुम्ही नाव घेतलं. आज काय झालं आमच्या कोपऱ्यात तो आला होता, असं मला कळलं. तो खूपच बरळला म्हणून कळलं. वयामानाने ते होतंच असतं. इथून पाठीमागे आमच्या नजरेत त्यांची इज्जत होती. हे मी मनापासून बोलतोय. व्यक्ती म्हणून इज्जत होती, त्यांच्या विचारांना मात्र विरोध होता. व्यक्ती म्हणून शत्रुत्व नव्हतं, पण त्यांनी आज पातळी सोडली. एवढ्या मोठ्या व्यक्तीने, ज्याचे विचार चांगले आहेत, त्याने एका समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने काय बोलावं हे तरी कळलं पाहिजे. माझी सासुरवाडी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरची. तो म्हणतो सासऱ्याची भाकर काय खातो? तुझी खातो का, तू तर आमची खातोय”, असा थेट वार जरांगे पाटलांनी भुजबळांवर केला.

हे ही वाचा >> “एक मंत्री उघडपणे…”, संभाजीराजे शिंदे सरकारवर भडकले, भुजबळांचा राजीनामाच मागितला

“त्या गोदावरीच्या पट्ट्यात आम्ही बीड जिल्ह्यातील खूप लोक आलेलो आहोत. कारण तिथे पाणी आहे म्हणून. मी खोटं बोलत नाही. गोदावरी जालना जिल्ह्यात अर्धी आहे आणि बीड जिल्ह्यात अर्धी. तिथं ग्रीन बेल्ट आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यातील लोकांनी तिथे शेती घेतलीये आणि कष्ट करतेत. तसाच मीही एका कुटुंबातील आहे. आमचं जेवण तुम्ही काढायला लागलेत, पण तुमचं तर सगळं मला माहितीये. मी बारीक असलो तरी… तुम्ही मुंबईला काय केलं. तुम्ही कोणत्या पाहुण्याचं खाल्लं. कुठं-कुठं काय केलं. आम्ही तरी आमच्या कष्टाचं खातो. घाम गाळतो आणि खातो. तुम्ही आमच्या जनतेचं रक्त गोचिडासारखं पिलात आणि त्याच्यावर तुम्ही जगलात लक्षात ठेवा”, असं पलटवार जरांगे पाटलांनी कोल्हापूरमधील सभेत भुजबळांवर केला.

ADVERTISEMENT

“भुजबळांना रोखा नाहीतर…”

“महाराष्ट्र सदन बांधताना महाराष्ट्रातील जनतेचा पैसा होता. तुम्ही तो लुबाडला. तुमच्याकडे एकदिवसाचं जेवण करायलाही पैसे नव्हते असा एक काळ होता. तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी जनतेच्या जीवावर आणि त्यांचं रक्त पिऊन कमावली म्हणून तुम्हाला जेलमध्ये बेसन भाकर खायला जावं लागलं. लोकांच्या लेकरांचा तळतळाट तुम्हाला लागला. मधल्या काळात मी त्यांना बोलायचं बंद केलं होतं. ते मला म्हणाले होते की, मला एकट्याला बोलायला लागले. मी बंद केलं. दहा पंधरा दिवस शांत वातावरण होतं. मग काही गरज होती का? सरकारने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतोय की, त्या व्यक्तीला या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा आहे. त्यांना रोखा अथवा आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल”, असा इशारा जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला दिला.

ADVERTISEMENT

“एक मंत्री जो घटनात्मक पदावर बसलाय, तो व्यक्ती कुणाचाच नसतो. तो जनतेचा असतो. त्या व्यक्तीने सर्रास सांगावं की यांचे बोर्ड फाडून टाका, याचा अर्थ होतो की, सामाजिक दंगली त्यांना घडवून आणायच्या आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगतो की, त्यांना आवरा, नसता ती तुमची भूमिका आहे का तेही स्पष्ट करा”, असं म्हणत जरांगेंनी शिंदे सरकारलाही भूमिका मांडण्यास सांगितलं आहे.

हे ही वाचा >> ‘तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…’, भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

“आमचे बोर्ड आहेत. बोर्ड तुमचेही लागणार आहेत. आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या. आम्हाला या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. मी राजर्षि शाहू महाराजांच्या पवित्र भूमितून सांगतोय की आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचं नाही. यापुढेही आम्हाला शांततेत आंदोलन करायचं आहे. माझा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शब्द आहे. सरकारने त्यांचं बोलायचं बंद करावं, नसता आमचा नाईलाज होईल. आम्ही साधा बांध फोडला तरी दोन-दोन पिढ्या एकमेकांना बोलत नाही. मग आमचं आरक्षण खाणाऱ्यांचं आम्ही काय करणार?”, असं म्हणत भुजबळांविरोधात जरांगेंनीही दंड थोपटले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT