
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) बदल्या हा कायम चर्चेचा विषय असतो. पण यावेळेस तो जास्त चर्चेत राहिला त्याचं कारण म्हणजे या बदल्यांमध्ये विशेष पोलीस आयुक्तपद (special commissioner of police) निर्माण करुन फडणवसींच्या (Devendra Fadnavis) जवळचे असलेल्या देवेन भारती (Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली असा होणारा आरोप.
राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या भरतीसाठी विशेष जी आर काढला. देवेन भारतींची नियुक्ती ही राज्यातल्या सत्ता संघर्षाशीही (Maharashtra political crisis) जोडली जातेय. त्यासाठी काय कारणं दिली जाताहेत आणि कोण आहेत देवेन भारती (Who is Deven Bharti) तसंच ते फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) जवळचे असल्याचं का बोललं जातंय हेच समजून घेऊयात...
मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष पोलीस आयुक्त पद (special commissioner of police, mumbai) निर्माण करण्यात आलं. दिल्लीच्या (Delhi) धरतीवर निर्माण करण्यात आलेल्या या पदावर 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती राज्य सरकारने खास जी.आर. काढून जाहीर केली आहे.
देवेन भारती हे या मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्तपदावर बसणारे पहिले आयपीएस अधिकारी ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी वेगळ्या कॅडरची निर्मिती करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील संचालक, सुरक्षा आणि अंमलबजावणी या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या पदाचं नाव बदलण्यात आलं आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारने 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याचवेळी बातमी आली ती पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात येत असल्याची. त्याच वेळेस या पदावर देवेन भारती यांच्या नेमणुकीची चर्चा रंगली.
अखेरीस सरकारने तो निर्णय जाहीर केला आणि 5 डिसेंबरला भारती यांनी आपली विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली.
देवेन भारती यांच्या बदलीवरुन राजकीय चर्चा बरीच रंगली. देवेन भारती (Deven Bharti) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नजिकचे पोलिस अधिकारी असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची पहिली चर्चा.
याचं कनेक्शन फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या भारती यांच्या जबाबदारीशी जोडलं जातंय. भारती हे त्या काळात कायदा सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त होते. त्यानंतर त्यांची बढती दहशतवादविरोधी पथकाच्या अतिरिक्त महासंचालकपदी करण्यात आली होती.
महाविकास आघाडीच्या काळात याच भारतींची कमी महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात भारती यांच्यासह दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2017 मध्ये एका बांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी भारती यांनी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त होते त्यावेळच्या प्रकरणावरुन ही गुन्हा दाखल झाला होता.
हा मुद्दाही भारतींच्या बदलीशी जोडला जातोय. महाविकास आघाडीच्या काळात भारतींना कमी महत्त्वाचं पद दिल्याने फडणवीसांच्या काळात त्यांना चांगलं पद मिळेल अशी चर्चा बरीच आधीपासून रंगली होती.
दुसरा मुद्दा म्हणजे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा समान दर्जा असलेलं पद निर्माण करुन भारतींना पदावर आणल्याने हा फणसाळकर यांना धक्का असल्याचं बोललं जातंय. फणसाळकर हे शिंदेंच्या जवळ असल्याने गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी पोलीस दलात होल्ड रहावा यासाठी ही नियुक्ती केल्याची चर्चा आहे.
'महाराष्ट्र टाईम्स'ने भारतींची ही बदली ही मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचे सहकारी अजय आशर यांच्या ‘मित्र’ वरील नियुक्तीवेळी मौन बाळगलं आणि आता त्याची वसूली भारतींच्या बदलीने केली असं आपल्या बातमीत म्हटलंय.
तिसरा राजकीय मुद्दा म्हणजे भारती यांची नियुक्ती ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आली. हे सांगण्यासाठी 2017 सालातल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल बोलावं लागेल. त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे युतीत होते. मात्र दोन्ही पक्षांनी वेगळी निवडणूक लढवली होती.
फडणवीसांनी सगळी शक्ती पणाला लावून आव्हान उभं केलं होतं. या निवडणुकीच्या काळात भारती हे मुंबई पोलीस सहआयुक्त पदावर होते. त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था विभाग होता. मुंबईतली सर्व पोलीस ठाणी त्यांच्या अधिकाराखाली होती.
कोणत्या चौकसभेला परवानगी द्यायची? कोणत्या वेळात जाहीर सभेला परवानगी द्यायची? कोणाला नाकारायची? या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होत्या. आताही मुंबईचे पाच सहआयुक्त भारती यांना रिपोर्ट करणार आहेत.
या सहआयुक्तांवर कायदा सुव्यवस्था, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक आणि प्रशासन या विभागाची जबबादारी आहे. या सगळ्या विभागाचे सहआयुक्त हे थेट भारती यांना रिपोर्ट करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकामध्ये याचा राजकीय परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या नियुक्तीवरुन काँग्रेसनंही थेट फडणवीसांनावर टीका केलीय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीस हे राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राज्य पोलीस दलात मोडतोड करत असल्याचा आरोपही केलाय.
या राजकीय चर्चा बाजूला ठेवल्या तर देवेन भारती यांची पोलीस अधिकारी म्हणून केलेल्या कामाचाही विशेष उल्लेख करण्यात येतो.
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा तपास, मिड डे या वृत्तपत्राचे पत्रकार जे.डे. यांच्या हत्येचा तपासही त्यांनी केला होता. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यासाठी देवेन भारती ओळखले जातात.
26/11 प्रकरणातला दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जेव्हा फाशी देण्यात आली, त्याची जबाबदारी ज्या मोजक्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती त्यापैकी एक देवेन भारती होते.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे.
मुंबई हल्ल्यासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला आहे.एप्रिल 2015 मध्ये मुंबईच्या सहपोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. या पदावर सर्वाधिक काळ सेवा बजावण्याची संधी देवेन भारती यांना मिळाली. या दरम्यान देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केलेला आहे.
देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त म्हणून सायबर क्राइमशी संबंधित हायप्रोफाइल केसेस आणि ते दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणेही हाताळतील. पण, देवेन भारती यांची बदली हा राजकीय संघर्षाचा भाग आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.