मुंबईची खबर : ठरलंय नक्की, वॉटर मेट्रो पक्की! मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार वॉटर मेट्रो, काय आहे सरकारचा प्लॅन?
महाराष्ट्र सरकार लवकरच 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत असून, यामुळे शहरांतर्गत आणि आसपासच्या प्रदेशातील प्रवासाची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (MMB) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : ठरलंय नक्की, वॉटर मेट्रो पक्की!
मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार वॉटर मेट्रो
काय आहे सरकारचा प्लॅन?
Mumbai Water Metro : मुंबईतील लोकल ट्रेन, बस आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (MMB) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यावर मुंबई आणि आसपासच्या खाडी परिसराचा वापर करून प्रवाशांना जलद आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. काही महिन्यांपूर्वी कोची येथील वॉटर मेट्रोप्रमाणे महाराष्ट्रातही वॉटर मेट्रो सुरु करण्यात येईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.
26 सुसज्ज टर्मिनल्स उभारणार
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 16 जलमार्गांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या 8 मार्गांचे नूतनीकरण केले जाईल, तर 8 नवीन मार्ग विकसित केले जातील. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर यांसारख्या शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी 26 सुसज्ज टर्मिनल्स उभारण्याचे नियोजन आहे.
हे ही वाचा : 'आमच्यात कुठलेही विषय लपवण्याची आवश्यकता नाही..' उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल फडणवीस काय म्हणाले?
वाहतुक कोंडीवर पर्याय
मुंबईची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि प्रवाशांच्या संख्येमुळे रस्ते आणि रेल्वे यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतात. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने वॉटर मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून, रस्ते आणि रेल्वेवरील प्रवाशांचा भार हलका करणारा ठरेल. खाडी आणि समुद्राने वेढलेल्या मुंबईसाठी जलवाहतूक हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत सोयीस्कर मार्ग आहे.
हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..
एमएमआरची नवी जीवनवाहिनी
वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांना अधिक सुलभपणे प्रवास करता येईल. आधुनिक बोटी, अद्ययावत वेटिंग एरिया आणि चांगली कनेक्टिव्हिटी यामुळे हा प्रवास सध्याच्या जुन्या फेरी सेवांच्या तुलनेत अधिक दर्जेदार असेल. तसेच, खासगी गाड्यांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. यामुळे हा प्रकल्प येणाऱ्या काळात मुंबई आणि एमएमआर (MMR) क्षेत्रातील दळणवळणाची नवी जीवनवाहिनी म्हणून समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









