गर्भवतीला रुग्णवाहिका न मिळाल्यानं बाळ गेलं, शेवटी बाळाचा मृतदेहही बॅगेतच घरी आणला, घटना काय?
एकीकडे पालघर जिल्ह्यात वाधवन बंदर, बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांची चर्चा आहे, तर दुसरीकडे गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही आणि मृत बाळाचा मृतदेह बॅगेत घेऊन प्रवास करावा लागतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पालघरमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यानं बाळाचा मृत्यू

नवजात बाळाचा मृत्यू झाल्यावर त्यालाही नाही मिळाली रुग्णावाहिका
Palghar Mokhada News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात बालमृत्यूंची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने ही घटना घडल्याचं पालकांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोखाडा ग्रामीण रुग्णालय आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी फिरूनही बाळाचा जीव वाचवता आला नाही. मात्र, बाळाची आणि कुटुंबाची हेळसांड तेव्हाही थांबली नाही. याहूनही हृदयद्रावक बाब म्हणजे, मृत बाळाचा मृतदेह बॅगेत ठेवून नाशिक ते पालघर असा 80 किलोमीटरचा प्रवास पालकांना बसने करावा लागला. या घटनेनं आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून, जबाबदार यंत्रणांवर कारवाईची मागणी होतेय.
हे ही वाचा >> 'मी या पुढे कधीही एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही', क्रिकेटरचं अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठं वक्तव्य
पहाटे पोट दुखलं, तेव्हा 108 ला फोन केला...
मोखाडा तालुक्यातील जोगलवाडीतील 26 वर्षीय गर्भवती महिला अविता सखाराम कवर यांना पहाटे 3 वाजता पोटदुखी सुरू झाली. त्यांनी 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला, पण रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं सकाळी 9 वाजता पुन्हा संपर्क केला. तरीही दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर खासगी वाहनानं अविताला खोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. तिथे उपचार शक्य नसल्यानं त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, तिथेही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेरीस आसे उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागवून संध्याकाळी 6 वाजता अविताला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. म्हणजेच, गर्भवती महिलेला घरी पोटदुखी सुरू झाल्यापासून रुग्णालयात पोहोचण्यास 14 तास लागलं. तपासणीत शिशुचा गर्भातच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अविताला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
बाळाचा मृतदेह आणायलाही मिळाली नाही रुग्णवाहिका
नाशिक जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करून अविताला वाचवण्यात यश आलं. मात्र, मृत बाळाचा मृतदेह घरी नेण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाने घेणं अपेक्षित असताना मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनासाठी पैसे नसल्यानं सखाराम कवर यांनी मृत बाळाचा मृतदेह बॅगेत ठेवून नाशिक ते पालघर असा 80-90 किलोमीटरचा बस प्रवास केला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या नाकर्तेपणावर टीका होतेय.
हे ही वाचा >> गिझर लिक झालं, नवविवाहित दाम्पत्याचा गुदमरून अंत? फोन लागत नाही म्हणून कुटुंबीय घरी आले तर...
एकीकडे पालघर जिल्ह्यात वाधवन बंदर, बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांची चर्चा आहे, तर दुसरीकडे गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही आणि मृत बाळाला बॅगेत घेऊन प्रवास करावा लागतो.
पोलिसांनीही मारहाण केल्याचा आरोप
सखाराम कवर यांनी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. यावेळी पोलिसांनी पालकांवर लाठीमार केल्याचा आरोप सखाराम यांनी केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी आमदार सुनील भुसारा यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.