'भात टाकलाय शिजायला...' CJP च्या आंदोलनात पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया?
सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले, तरी अभिजित दीपके हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. पुण्यातदेखील विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला होता. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'भात टाकलाय शिजायला...'
CJP च्या आंदोलनात पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया?
CJP Protest Pune : पुणे येथे विविध शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि देशभरातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार, नीट (NEET) परीक्षा घोटाळा आणि वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांविरोधात एक भव्य निषेध मोर्चा काढला. शनिवार वाडा व लाल महाल परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चात केवळ तरुण विद्यार्थीच नव्हे, तर वकील, प्राध्यापक, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक आणि घोषणांचे फलक घेऊन शिक्षण यंत्रणेतील अपयशाचा आणि वाढत्या भ्रष्टाचाराचा तीव्र निषेध नोंदवला. "आमचे भविष्य सुरक्षित करा", "शिक्षणातील गैरव्यवहार थांबवा" आणि "दोषींवर कडक कारवाई करा" अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भरपावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह आणि संताप कायम असल्याचे चित्र दिसून आले.
आंदोलक काय म्हणाले?
मोर्च्यात सहभागी झालेल्या एका मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने सांगितले की, "जर आता आपण प्रशासनाला उत्तरदायी धरले नाही, तर त्यांना अशा प्रकारच्या ढिसाळ कारभाराची सवय होईल. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे कष्टकरी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे." तर एका आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की, ही लढाई केवळ वैयक्तिक नोकरीपुरती मर्यादित नसून देशातील शिक्षण व्यवस्थेच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिला वकिलाने संताप व्यक्त करत म्हटले, "अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. डॉक्टर आणि वकील होण्यासाठी तरुण दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देतात, मग देश चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी कोणतीही पात्रता किंवा परीक्षा का नसावी? जर आज आपण रस्त्यावर उतरलो नाही, तर येणाऱ्या पिढीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील."
हे ही वाचा : Inside Story: 'इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहात का?', मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना अचानक विचारलं अन्...
समाजाची शोकांतिका
मोर्चात सहभागी झालेल्या एका सायकॉलॉजीच्या प्राध्यापकांनी बेजबाबदार प्रशासनावर टीका करताना म्हटले की, "पीएचडीसारखी उच्च पदवी घेतलेल्या व्यक्तींनाही आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही शिक्षण व्यवस्थेची आणि समाजाची शोकांतिका आहे." तसेच एका एमपीएससी परीक्षार्थीने आपले वास्तव मांडताना सांगितले की, "पेपर फुटीच्या सत्रामुळे हताश होऊन अभ्यास सोडून आता पोटापाण्यासाठी नोकरी शोधावी लागत आहे. सरकारने ही पेपर फुटी थांबवून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुणांना न्याय दिला पाहिजे."
