Mla Disqualification : अध्यक्ष काही याचिका फेटाळू शकतात; निकमांनी काय सांगितलं?
Shiv sena Disqualification verdict updates : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणात काय निर्णय देऊ शकतात, याबद्दल उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची शक्यता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT

Mla Disqualification Verdict ujjwal nikam : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल देण्यापूर्वी केलेल्या विधानातील एक गोष्ट अधोरेखित करत विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील काही याचिका फेटाळून लावू शकतात, असा अंदाज निकम यांनी व्यक्त केला. नेमक उज्ज्वल निकम काय बोलले ते वाचा…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्यापूर्वी उज्ज्वल निकम म्हणाले की, “आजच्या या निकालाचे भविष्यात दुरोगामी परिणाम आपल्याला बघायला मिळतील. लोकशाही राज्यात ज्या कारणा करिता हे १० परिशिष्ट आणण्यात आले, घोडाबाजार थांबवण्यासाठी, आमदारांची पळवापळवी थांबवण्यासाठी… हा उद्देश आज खरोखर सफल झाला आहे का? हा यक्षप्रश्न आज सामन्य माणसांच्या मनात आहे.”
“आपण हे बघितलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने विधिमंडळाचा पूर्ण आदर राखला. कारण लोकशाहीमध्ये असे संकेत आहेत की, लोकशाहीच्या स्तभांनी एकमेकांवर अतिक्रमण करू नये. या मूलभूत तत्वाचा आदर राखून सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार घटनेतील १०व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांना असल्याने, त्यांनी (सुप्रीम कोर्ट) तो निर्णय त्यांच्याकडे सोपवला. हा निर्णय सोपवत असताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत”, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
Shiv Sena Mla Disqualification : “कोण जिंकलं कोण हारलं यापेक्षा…”
निकम म्हणाले, “आता या निरीक्षणांचं अध्यक्ष पालन करणार की, त्यांच्यापुढे येणाऱ्या पुराव्यांचा विचार करून निर्णय देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुनावणीत अध्यक्षांकडे तोंडी आणि लेखी पुरावाही सादर करण्यात आला. त्याचा अध्यक्षांनी त्यांच्या सोयीसाठी याचिकांचे सहा गट करून सुनावणी ऐकली. आज जो निर्णय येणार आहे, त्यातील ऑपरेटिव्ह भागच येणार आहे. संपूर्ण निकाल यायला वेळ लागेल. ऑपरेटिव्ह भागात ही गोष्ट स्पष्ट होईल की, कोण जिंकलं आणि कोण हारलं. जिंकल कोण आणि हारलं कोण यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा संदर्भ आणि अर्थ अध्यक्ष कसे लावतात, हे बघावं लागेल”, असे भाष्य उज्ज्वल निकम यांनी केले.