
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (nagpur rto regional office) एका महिलेने प्रादेशिक परिवहन अधिकारी (rto regional officer) रवींद्र भुयार (Ravindra bhuyar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (woman employee allegations on nagpur rto regional officer)
प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) या पदावर कार्यरत असलेले रवींद्र भुयार यांनी एका महिला मोटर वाहन निरीक्षकांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही मोटर वाहन निरीक्षक असून, तिने या संदर्भात राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे.
शासनाने तात्काळ या तक्रारीची दखल घेत राज्याच्या महिला तक्रार निवारण समितीला चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, 'कार्यालयात काम नसताना भुयार हे तासन् तास बसवून ठेवतात व स्त्री लज्जा वाटेल असे विनोद करतात. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील अशी वक्तव्य करतात."
पीडित महिलेने आरोप करताना म्हटलं आहे की, "माझे अनेक परपुरुषांशी लैंगिक संबंध आहे. माझा मुलगा पतीपासून नव्हे, तर दुसऱ्या पुरुषापासून झालेला आहे. त्याची डीएनए टेस्ट झाली आहे, अशा प्रकारची वक्तव्य भुयार हे समाजात पसरवत आहेत."
महिलेने तक्रारीत असंही म्हटलं आहे की, "कार्यालयाचे वाहन असतानाही मला घरी सोडायला सांगतात. लाँग ड्राईव्हला जाऊ असं बोलतात. चहाचं निमित्त करून घरात घेऊन जातात. रात्री उशिरापर्यंत घरी बसतात. मी नकार दिला की, लाचलुचपत विभागाकडे खोटी तक्रार करण्याची धमकी देतात. रात्री 12 वाजता, 10 वाजता, सकाळी 7 वाजता कॉल करतात. तुम्ही चाळीशीच्या वाटत नाही, कॉलेजमधील मुलगी वाटता, असं बोलतात," असंही तक्रारीत म्हटलेलं आहे.
"हा त्रास सहन न झाल्यानं मी माझ्या पतीला आणि भावाला सांगितलं. 9 जानेवारी 2023 रोजी माझ्या भावाने या सगळ्या गोष्टींबद्दल भुयार यांना विचारणा केली. तिथे नागपूर ग्रामीणच्या अधिकाऱ्यासह इतरही अधिकारी होते. त्यांच्यासमोर भुयार यांनी माफी मागितली आणि पुन्हा असं करणार नाही, असं सांगितलं. मात्र, पुन्हा त्रास देत आहेत", असंही महिलेनं म्हटलं आहे.
"माझ्या संसारात धोका निर्माण करून, माझ्या तक्रारी करून बदनामी करतील. यामुळे माझ्या जिवास काही धोका झाल्यास, काही बरं वाईट झाल्यास त्यास रवींद्र भुयार जबाबदार राहतील. त्यांच्याविरुद्ध कारवाई करून मला न्याय द्यावा," असं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
याप्रकरणी रवींद्र भुयारी यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी आरोप फेटाळून लावले. तक्रारदार महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीला सामोरं जाणार असून, तिथे बाजू मांडणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.