Seven members of a family suicide case Pune :
दौंड : एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात (Seven deadbody found in a bhima) आढळून आल्यानंतर पुण्यात (Pune) जिल्ह्यात खळबळ उडाली. मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्यानं समाजात बदनामी होण्याच्या भीतीने ७ जणांनी एकाचवेळी आत्महत्या (commit suicide) केल्याचं सांगण्यात आलं. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा सुरु होती.
मात्र, बुधवार (२५ जानेवारी) या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं. या ७ जणांनी आत्महत्या (suicide) केली नाही, तर त्यांची हत्या (Murder) करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) ज्या ठिकाणी मयत कुटुंब राहत होते त्यांच्या बाजूला राहत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. मात्र, अतिशय क्लिष्ट असा या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूंनी तपास केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राणी श्याम फुलवरे, श्याम पंडीत फुलवरे, संगिता मोहन पवार, मोहन उत्तम पवार, रितेष उर्फ भैय्या श्याम फुलवरे, छोटु श्याम फुलवरे, कृष्णा श्याम फुलवरे या सात जणांचे मृतदेह १७ ते २२ जानेवारी दरम्यान भीमा नदी पात्रात मिळून आले होते. सुरुवातीला हे प्रकरण म्हणजे एकाच कुटुंबाची सामूहिक आत्महत्या असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अंधश्रद्धा प्रकरणातून हत्या झाली असावी असा कयास लावण्यात आला. मात्र पोलीस तपासात ही हत्या वेगळ्याच कारणाने झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी निघोज येथील अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार या संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर हत्येचे गूढ समोर आलं. मयत कुटुंबातील मोहन उत्तम पवार यांचा मुलगा अमोल पवार आणि आरोपींपैकी एक असलेल्या अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजय पवार आणि जगताप नामक व्यक्ती हे तिघे दारू पिण्यासाठी गेले होते.दारू पिल्यानंतर धनंजय याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.
मात्र त्या अपघाताची माहिती अमोल पवारने त्याच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती. मात्र, धनंजय पवारचा अपघातात मृत्यू झाला नाही तर अमोल पवार यानेच त्याची हत्या केली असावी असा संशय त्याच्या कुटुंबियांना होता. हाच राग मनात धरून अमोल पवार याच्या कुटुंबियांची हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलं.
मात्र, दरम्यानच्या काळात १७ जानेवारीला अमोल गावातीलच एका विवाहित महिलेला घरुन पळून घेऊन गेला होता. त्यानंतर लगेचच अमोल पवारचे संपूर्ण कुटुंब हे निघोज गाव सोडून गेल्याने आधी संशयाची सुई संबंधित विवाहितेच्या कुटुंबाकडे गेली होती. मात्र, पोलिस तपासात धनंजय पवार मृत्यू प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या अँगलने पोलिसांनी तपास केला. त्यानंतर बुधवारी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. अमोल मात्र संबंधित विवाहितेसोबत अद्याप फरार आहे. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.
अमोल पवार याने मुलीला पळून नेल्याची संधी साधत आणि संपूर्ण कुटुंबाचा घातपात केल्यावर संशय हा संबंधित पळून नेलेल्या घरच्यांवरचं जाईल असा अंदाज बांधून ही हत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र केवळ गैरसमजातून सात जणांची हत्या झाल्याने पुणे तसेच नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल झाला आहे. तर पारनेर पोलिस ठाण्यात 'मिसिंग'चा गुन्हा दाखल आहे.