'जा बेटा घरी जा..', 'बेटा' म्हणाल्याने युवकाच्या डोक्यात तिडीक गेली, थेट हॉटेल मालकाचा घेतला जीव

मुंबई तक

Crime News : एका चहा व्यावसायिकाची केवळ 'बेटा' म्हटल्याच्या कारणावरून चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'जा बेटा घरी जा..', 'बेटा' म्हणाल्याने युवकाच्या डोक्यात तिडीक गेली

point

थेट हॉटेल मालकाचा घेतला जीव

Crime News : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील अशोका गार्डन परिसरात रविवारी रात्री उशिरा एका क्षुल्लक वादातून भीषण हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेत एका 35 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाची ओळख विजय मेवाडा अशी पटली असून, तो सुभाष कॉलनीचा रहिवासी होता. विजयचा अशोका गार्डन आणि कोलार क्षेत्रात चहाचा मोठा व्यवसाय होता. रविवारी रात्री साधारण 1:30 च्या सुमारास आपले हॉटेल बंद केल्यानंतर तो आपल्या कर्मचाऱ्यांना प्रगती नगर येथे सोडण्यासाठी गेला होता. याच प्रवासादरम्यान त्याची गाठ आरोपींशी पडली आणि एका साध्या शब्दावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट रक्तापातात झाला.

प्राप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी आसिफ उर्फ बम हा आपल्या काही साथीदारांसह घटनास्थळी आधीच हजर होता. हे सर्व आरोपी विजयच्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना पूर्वीपासून ओळखत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींनी कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती केली आणि त्यांच्यावर दबाव टाकला. मात्र, कर्मचाऱ्यांनी कामाचे कारण सांगून त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारावरून वातावरण तापले आणि आरोपींनी कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून विजयने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आरोपींना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि समजावताना मुख्य आरोपीला 'बेटा' असे संबोधले. केवळ 'बेटा' हा शब्द आसिफला इतका अपमानजनक वाटला की त्याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने विजयवर सपासप वार केले. या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला आणि तिथे असलेल्या इतरांनीही त्याला मारहाण केली.

आरोपींच्या अटकेसाठी हिंदू संघटनांचे आंदोलन आणि पोलिसांची कारवाई

या भीषण घटनेनंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि स्थानिक नागरिक तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला घेऊन रुग्णालयात पोहोचले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजयच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते अशोका गार्डन पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर बसून चक्क हनुमान चालीसाचे पठण केले आणि आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी लावून धरली. वाढता तणाव लक्षात घेता प्रशासनाकडून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी आसिफ अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. फरार आरोपीची माहिती देणाऱ्यासाठी पोलिसांनी 30,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण भोपाळमध्ये हळहळ व्यक्त होत असून एका शांत स्वभावाच्या व्यापाऱ्याचा अशा प्रकारे बळी गेल्याने जनमानसात प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधून सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

हे वाचलं का?