Lok Sabha Election 2024: ठाकरेंना नको होतं तेच झालं... 'मविआ'तील पहिल्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब!

मुंबई तक

ADVERTISEMENT

सांगलीत बंडखोरी, विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतलाच नाही!
सांगलीत बंडखोरी, विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतलाच नाही!
social share
google news

Sangli Lok Sabha Election 2024: अभिजीत करंडे / अनुजा धाक्रस, सांगली: सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अपक्ष निवडणूक लढवण्यावर विशाल पाटील हे ठाम आहेत. आज (22 एप्रिल) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र, विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. अर्ज मागे घेण्याची वेळ ही आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. तोपर्यंत विशाल पाटील यांचं मन वळविण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू होता. मात्र शेवटपर्यंत विशाल पाटील हे त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण यामुळे जे उद्धव ठाकरेंना नको होतं तेच झालं आहे. मविआमध्ये बंडखोरी होऊ नये अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. पण सांगलीत बंडखोरी झाल्याने ठाकरे नाराज होण्याची शक्यता आहे. (lok sabha election 2024 vishal patil did not withdraw his application the first revolt in  mahavikas aghadi a three way fight in sangli constituency)

सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच पक्षाने पुन्हा तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वाटेला गेल्याने तिथे त्यांच्याकडून चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसमध्ये असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा>> "चहाच्या टपरीवर असताना उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर", शिंदेंचा गौप्यस्फोट

अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांना या निवडणुकीसाठी लिफाफा हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या चिन्हावर निवडणूक लढवत मतदारांपर्यंत पोहचविण्याचं मोठं आव्हान विशाल पाटलांसमोर असणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशाल पाटलांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार?

सांगलीच्या जागेचा पेच हा शेवटपर्यंत कायम होता. पण तो सोडविण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आलं नाही. 

सांगली ही काँग्रेसची हक्काची जागा होती आणि ती त्यांना मिळावी अशी त्यांची इच्छा होती मात्र, शिवसेनेचा (ठाकरे गट) हट्ट होता की, आम्ही कोल्हापूरची जागा तुमच्यासाठी सोडली आहे. अशा परिस्थितीत मावळ ते कोल्हापूर अशा सगळ्याच जागा आम्ही सोडल्या तर पश्चिम महाराष्ट्रात आमचे उमेदवारच नसतील. असं काँग्रेसला सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सांगलीची जागा लढण्याचा निर्णय घेतला. 

ADVERTISEMENT

एकीकडे चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने सांगलीतील आपला उमेदवारच जाहीर करून टाकला होता. त्यामुळे पेच वाढला होता. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीची जी संयुक्त पत्रकार परिषद झालेली त्यामध्ये सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचं मान्य केलं होतं. 

ADVERTISEMENT

त्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. हा उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घ्यावा यासाठी बरेच प्रयत्न केले गेले मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत विशाल पाटलांनी आपला अर्ज काही मागे घेतला नाही. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीची बरीच अडचण वाढली आहे. 

कारण या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवेसना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार असे तीन महत्त्वाचे पक्ष हे एकत्र आले आहेत. अशावेळी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी करू नये असा समझोता झालेला असतानाही विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहत ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणीत आणलं आहे. 

काँग्रेसकडून विशाल पाटलांवर कारवाई होणार? 

विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी ही वाढली आहे. कारण त्यांना शिवसेनेला असं पटवून द्यावं लागेल की, ते विशाल पाटलांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. आम्ही त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहोत. पक्षाचा आदेश डावलून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 

याच कारणामुळे काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांच्यावरील कारवाई ही अटळ आहे. 

उद्धव ठाकरे काय करणार?

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही होते. मात्र, तरीही सांगलीत जी बंडखोरी झाली त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा>> Eknath Shinde : मिलिंद नार्वेकरांना लोकसभा लढवण्याची ऑफर दिलीये का? शिंदे म्हणाले...

जरी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली तरी याबाबत उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याच कामंही काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. त्यामुळे आता या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाच जणांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे

दरम्यान, सांगली लोकसभेच्या निवडणुकीतून पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. यात रेणुका प्रकाश शेंडगे, बापू तानाजी सूर्यवंशी, दिगंबर गणपत जाधव, प्रतीक प्रकाशबापू पाटील, सुरेश तुकाराम टेंगले या पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेली सांगली लोकसभा मतदारसंघात अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आत ही निवडणूक तिरंगी होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT