'मी माफी मागतो...', विधानसभेत असं काय घडलं की, आव्हाडांनी थेट मागावी लागली माफी? क्रोनोलॉजी समजून घ्या!
NCP (SP) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयक विधयेकावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत काल (16 मार्च) धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६ (Freedom of Religion Bill, 2026) वरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भात केलेल्या वादग्रस्त दाव्यांमुळे प्रचंड खळबळ उडाली. सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी तीव्र विरोध करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृह तहकूब करावे लागले.
आव्हाड यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला. पण त्याचवेळी त्यांनी त्यावेळी बोलताना काही वादग्रस्त विधान केलं. ज्यानंतर सत्ताधारी आघाडीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या आमदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. मंत्री शंभूराज देसाई यांनी या दाव्यांची ऐतिहासिक सत्यता आव्हाड यांच्याकडून सिद्ध करण्याची मागणी केली आणि हे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान असल्याचे म्हटले.
सभागृहात आमदार वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करू लागले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही”, “माफी मागा” अशा घोषणा देत सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. परिणामी, तालिका अध्यक्षांनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केले.
तहकूब नंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर आव्हाड यांनी प्रथम म्हटले की, “जर या वक्तव्याने भावना दुखावल्या असतील तर मी ते मागे घेण्यास तयार आहे.” मात्र, सत्ताधारी आमदारांनी फक्त मागे घेणे पुरेसे नसून, औपचारिक माफी (formal apology) मागितली पाहिजे. जोरदार घोषणाबाजीनंतर आणि विरोधानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाड यांना सभागृहाची माफी(express regret)मागण्याचे आदेश दिले. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अखेर सभागृहाची माफी मागितली आणि वादग्रस्त विधान पटलावरून काढून टाकण्यात आले.










