धाराशिव ग्राऊंड रिपोर्ट : टेंडरचे खेळ, निधीचं गणित आणि राजकारणातील 'लक्ष्मीदर्शन'

ओमकार वाबळे

'ऑपरेशन टायगर' आणि बंडखोरीच्या वादळानंतर धाराशिवचे राजकीय वातावरण कमालीचे बदललं आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात थेट जमिनीवर काय परिस्थिती आहे, हा एक डोळे उघडणारा ग्राउंड रिपोर्ट.

ADVERTISEMENT

Dharashiv Ground Report
Dharashiv Ground Report
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव ग्राऊंड रिपोर्ट

point

टेंडरचे खेळ, निधीचं गणित आणि राजकारणातील 'लक्ष्मीदर्शन'

Dharashiv Ground Report : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याविषयी एक मोठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली होती. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे आमदार फोडल्यामुळे निर्माण झालेल्या या भावनिक लाटेचा सर्वाधिक फायदा धाराशिवमध्ये झाला. महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी अत्यंत चिकाटीने हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला आणि त्यांचे निष्ठावंत शिलेदार ओमराजे निंबाळकर हे राज्यातील सर्वोच्च मताधिक्यांपैकी एका मोठ्या मार्जिनने विजयी झाले. मात्र, अवघ्या काही काळातच धाराशिवच्या राजकारणाने पुन्हा एकदा मोठी कूस बदलली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या समर्थकांसह सत्ताधारी महायुती (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत स्थानिक कार्यकर्ते, नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार आणि अगदी एसटी स्टँडपासून ते चहाच्या टपरीवरील सामान्य जनतेशी संवाद साधल्यानंतर या बंडखोरीमागचे प्रॅक्टिकल राजकारण आणि इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.

धाराशिवच्या राजकीय स्थित्यंतरामागील कारणे

धाराशिवच्या या राजकीय स्थित्यंतरामागे केवळ सत्ता बदल हे एकमेव कारण नसून, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेला असंतोष कारणीभूत ठरला आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आकडे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जिल्ह्यातील पकड किती सैल झाली होती, हे स्पष्ट होते. जिल्ह्यातील 55 जागांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले आणि जिल्हा परिषद हातची गेली. जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांपैकी 4 जागांवर शिवसेना तर 4 जागांवर भाजपचा ताबा आला. नगरपरिषदांमध्येही 4 भाजप आणि 4 शिवसेना असे समसमान विभाजन झाले. या निकालांमुळे ठाकरे गटाचा मूळ आधारस्तंभ असलेला तळागाळातील कार्यकर्ता पुरता हादरला होता. याच काळात सत्ताधारी भाजपचे नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी आणून स्वतःचे प्रस्त वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली.

या संपूर्ण घडामोडींमध्ये 'वरिष्ठांकडून वाऱ्यावर सोडल्याची' भावना कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक दाटून आली होती. महाराष्ट्रात एकीकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारखे दिग्गज नेते अगदी छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही प्रतिष्ठेचे बनवतात, स्वतः ठिकठिकाणी जाऊन बैठका घेतात आणि संपूर्ण मॅनेजमेंट फायनलाईज करतात. अगदी पुणे, पिंपरी-चिंचवड ते रायगड आणि परभणीपर्यंत हे नेते स्वतः तळ ठोकून पक्षाला बळ देत होते. याउलट, धाराशिवमध्ये समोरून सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड रसद पुरवली जात असताना उद्धव ठाकरे यांनी कोणतीही मोठी सभा घेतली नाही, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रचाराकडे फिरकले नाहीत, की संजय राऊत यांच्यासारखे पहिल्या फळीतील नेते रस्त्यावर उतरले नाहीत.

"निवडणूक लढवण्यासाठी केवळ भावनिकता पुरेशी नसते, तर पॅम्प्लेट वाटण्यापासून ते बॅनर लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला आर्थिक बळ (रसद) लागते. समोरून विरोधक इतके प्रबळ होत असताना पक्षाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने आम्ही उघडे पडत चाललो होतो," अशी प्रॅक्टिकल खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. स्थानिक पातळीवर तर अशी परिस्थिती झाली होती की, तिकीट वाटपापासून ते सर्व निर्णय राणाजगजितसिंह पाटीलच मॅनेज करत होते आणि इतर सर्व पक्ष त्यांच्याच इशाऱ्यावर चालत असल्यासारखे चित्र होते. अशा व्यूहरचनेत अडकून राजकीय अस्तित्व संपवण्यापेक्षा, जो नेता आपल्याला सर्व प्रकारचे बॅकिंग आणि बळ देईल, अशा एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ओमराजेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

हे वाचलं का?