'नार्वेकरांनी आशाताईंच्या नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला, त्यापेक्षा हिब्रूमध्ये... राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट
Raj Thackeray on Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडत असताना अनेक चुका केल्या आहेत. याबाबत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'त्या' कागदावर भेळ खाल्ली होती काय?
राज ठाकरे विधानसभा अध्यक्षांवर संतापले
Raj Thackeray on Rahul Narwekar, मुंबई : पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव विधानसभेत वाचत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फार अडखळलेले पाहायला मिळाले. शिवाय, त्यांना उच्चार देखील नीट करता आले नाहीत. त्यांचा शोक प्रस्ताव वाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विधानसभा अध्यक्षांना मराठी नीट वाचता येत नसल्याचं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. ते पोस्टमध्ये काय काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
हेही वाचा : पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...
राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ? नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे. सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?









