'...तेव्हा 5 लोकं मारलेली आम्ही', संजय दिना पाटलांचं धक्कादायक विधान, का बोलून गेले असं?
शिवसेना UBT पक्षातून बाहेर पडल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी "ऑपरेशन तुडवा" मोहिमेची घोषणा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय दिना पाटील यांनी विरोधकांना इशारा देणाऱ्या शैलीत अत्यंत आक्रमक वक्तव्य केले. ते म्हणाले की, "मी पोलीस वगैरे यांच्या भरोशावर नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट सोबत घेऊन फिरतो. मला सोडून द्या, माझ्या घरातील लोकांकडे जरी वाकड्या नजरेने पाहिलं तर घरात घुसून... एकदा असंच झालं होतं. त्यांना लक्षात नाही.. त्यांना सांगा की, त्यांचे आजोबा वैगरे असतील जिवंत.. तर एकदा माझे वडील असताना आलेले काहीजण पाच लोकं मेलेली.. पाच लोकं मारलेली आम्ही.. पुन्हा तशी स्थिती होऊ नये.'
हे ही वाचा>> 'संजय पाटील भो$, ती बंदूक तुझ्याच ढुं%$#@ घातली जाईल..', चिडलेल्या राऊतांची जीभ पुन्हा घसरली
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, "त्यांच्यात स्वतःमध्ये काही दम नाही. ते फक्त काही लोकांना चढवतात. दोन-चार फालतू दादा लोकं त्यांच्याकडे असतील, पण आम्हाला अशा दादांची गरज नाही. आम्ही स्वतः करणारे लोक आहोत," असेही म्हटले. बोलताना त्यांनी हाताने बंदुकीची निशाणी दाखवल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
ऑपरेशन तुडवाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य
शिवसेना UBT चे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटात मोठी राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी "ऑपरेशन तुडवा"ची घोषणा केली होती. यानंतर शिंदे गटातील नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.









