राहुल गांधींना दोन दिवसात ईडीने विचारले ३० प्रश्न, टायर जाळत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीचा तिसरा दिवस असून मागच्या दोन दिवसात ईडीकडून राहुल गांधींना सुमारे ३० प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी हे पाठ केल्याप्रमाणे किंवा पढवल्यासारखी उत्तरं देत आहेत असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलंय. राहुल गांधी यांच्या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे. राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू असल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. दोन दिवस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ईडी ऑफिसच्या जवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजही आंदोलन केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी टायर जाळले. त्यानंतर या घोषणाही दिल्या की कुणीही आमचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांना २ दिवस प्रश्न विचारले जात आहेत. अशात त्यांचे प्रश्न कालच संपू शकले असते मात्र ते ठरवल्यासारखी उत्तरं देत असल्याने आजही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. आज राहुल गांधींना यंग इंडिया आणि एजएलच्या निधीबाबत चौकशी करण्यात येते आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनाही ईडीने नोटीस बजावली होती. १ जून रोजी रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली. या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितलं होतं. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र हे सगळं सूडाचं राजकारण आहे असं काँग्रेसने म्हटलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याने तसंच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहता आलं नाही. राहुल गांधीही देशाबाहेर होते. मागच्या दोन दिवसांपासून राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. या मध्ये त्यांना ३० प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलं होतं. इंग्रजांविरोधी लढ्यात या वृत्तपत्राची महत्त्वाची भूमिका होती. इंग्रजांना देशातून हाकलून देण्याच्या उद्देशानेच हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं. १९३७ मध्ये सुरू झालेल्या नॅशनल हेरॉल्डचे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल हे सगळे प्रणेते होते.

ADVERTISEMENT

त्यावेळी या वृत्तपत्राचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की, १९४२ मध्ये छेडण्यात आलेल्या भारत छोडो लढ्यावेळी नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्रावर बंदी घालण्यात आली होती. १९४५ पर्यंत या वृत्तपत्रावर बंदी कायम होती.

ADVERTISEMENT

नॅशनल हेराल्डचं प्रकरण काय?

मार्च २००८ पर्यंत हे वृत्तपत्र सुरूवातीला देशातील स्वातंत्र्य लढ्याशी आणि त्यानंतर काँग्रेसशी संलग्न होते. १ एप्रिल २००८ मध्ये वृत्तपत्र बंद ठेवण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. हे वृत्तपत्र बंद करण्याच्या आधी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) कडून चालवलं जात होतं.

२००८ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेलं नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र कायमचं बंद करण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी २००९ मध्ये घेतला.

पुढे भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या कंपन्यातील अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. गांधी कुटुंबीयांकडून नॅशनल हेराल्डच्या (National Herald) संपत्तीत गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

१९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL ची स्थापना केली होती. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र काढण्यात आले. AJL वर ९० कोटींहून अधिक कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीचं नाव होतं यंग इंडिया लिमिटेड (Young India Limited).

या कंपनीमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ३८-३८ टक्के भागीदारी होती. एजेएलचे ९ कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले होते. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे याचं देणं लागणार होता. या प्रकरणात देशातील मोक्याच्या जागा कंपनीला अतिशय कमी किमतींमध्ये देण्यात आल्या, असे आरोप आहेत.

मुंबई, दिल्ली या शहरांमधील मोक्याच्या ठिकाणी या जागा होत्या. त्यांचं भाडे AJL कंपनीला मिळत होतं. शिवाय जागांचं एकूण मूल्य २ हजार कोटींच्या घरात असू शकते, असा आरोप आहे. ज्या कंपनीकडे कोणताही व्यवसाय नाही, अशी कंपनी ५० लाखांच्या मोबदल्यात २ हजार कोटींची मालक बनल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT