
- योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी नागपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचं गुढ उकलण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधांची माहिती पतीला दिल्याच्या रागातून भाचीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आत्यासह दोघांची हत्या केल्याचं उघड झालंय. रामटेक पोलिसांनी या प्रकरणात आरोपी भाची रितू आणि तिचा प्रियकर महेशला अटक केली आहे.
याशिवाय नागपूर पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं आहे. जयवंता भगत आणि संदीप मिश्रा अशी मृतकांची नावं असून संदीप हा जयवंताचा मानलेला भाऊ होता. सहा वर्षांपासून जयवंता आणि संदीप हे दोघेही रामटेकमधील एका शेतात काम करायचे आणि कुटुंबासह शेतातच राहात होते. दोन महिन्यांपूर्वी जयवंता भगत यांची भाची रितू रामटेकला आली होती.
रितू पाठोपाठ तिचा प्रियकर महेशही रामटेकला आला. रितू आणि महेश हे दोघंही दुसऱ्या शेतात काम करायला लागले. यादरम्यान जयवंता यांना रितू आणि महेश यांच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला. याची माहिती जयवंता यांनी रितूच्या पतीला दिली. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं लक्षात येताच त्याने रामटेकला येऊन वाद घातला. या वादानंतर पती रितूला घेऊन निघून गेला.
दोन दिवसांपूर्वी रितू आणि महेश हे दोन अल्पवयीन मुलांसोबत रामटेकला कारने आले. यावेळी त्यांनी जयवंता आणि संदीप या दोघांनाही बळजबरीने कारमध्ये बसवलं. काही अंतरावर गेल्यानंतर महेशने कुऱ्हाचीचा वार करुन संदीपचा खून केला. संदीपचा मृतदेह रामटेक येथील जंगलात फेकल्यानंतर आरोपींनी जयवंताची हत्या केली. जयवंताचा मृतदेह आरोपींनी भंडारा येथे टाकून पळ काढला.
दोन दिवसानंतर रामटेक पोलिसांना एका इसमाचा मृतदेह रामटेकच्या जंगलात आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला असता तो मृतदेह संदीप मिश्रा यांचा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता जयवंता देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर पोलिसांनी जयवंताचा शोध सुरू केला तेव्हा त्यांचा मृतदेह भंडारा जवळ आढळून आला. जयवंताचा शोध सुरू असतानाच त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला असताना जयवंताच्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला,ज्याच्या आधारे पोलिसांनी रितूला मध्यप्रदेश बालाघाट मधून अटक केली आहे. याशिवाय तिचा प्रियकर महेश आणि अन्य दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.