युद्धजन्य अफगाणिस्तानातून भारतीय आणि इतर देशांच्या राजदूतांना सोडवून आणणाऱ्या Indian Air Force ची शौर्यगाथा
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सध्या जगभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. तालिबानच्या राजवटीखाली रहायला लागू नये म्हणून नागरिक काबूल विमानतळावर गर्दी करताना दिसत आहेत. भारतानेही अफगाणिस्तानातील आपल्या दुतावासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं आहे. १९९२ सालीही अफगाणिस्तानात अशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारतीय हवाई दलाने रेस्क्यु ऑपरेशन करत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय लोकांना […]
ADVERTISEMENT

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सध्या जगभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. तालिबानच्या राजवटीखाली रहायला लागू नये म्हणून नागरिक काबूल विमानतळावर गर्दी करताना दिसत आहेत. भारतानेही अफगाणिस्तानातील आपल्या दुतावासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं आहे. १९९२ सालीही अफगाणिस्तानात अशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारतीय हवाई दलाने रेस्क्यु ऑपरेशन करत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढलं होतं.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या स्कॉर्डन लिडर (नि.) राजेश कुमार यांनी १९९२ साली झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव मुंबई तक सोबत शेअर केला आहे.
राजेश कुमार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी २९ वर्षांपूर्वी अशाच परिस्थितीतून भारताचे तत्कालीन राजदूत, दूतावासातले कर्मचारी आणि इतर आशियाई देशांमधील अधिकाऱ्यांना बाहेर काढलं होतं. याच रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान राजेश कुमार यांची अफगाणिस्तानचे माजी उप-राष्ट्रपती जनरल अब्दुल रशिद यांच्यासोबत भेट झाली होती. अमेरिकेने अफगाणिस्तानात आपलं पाऊल ठेवण्याच्या आधीच भारतीय हवाई दलाने युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्याचं राजेश कुमार अभिमानाने सांगत होते.
“१९९२ चं वर्ष होतं आणि त्यावेळी आग्रा येथील आमच्या एअर फोर्सच्या स्टेशनवर पहिल्यांदाच टीव्ही लावण्यात आला होता. बीबीसीवर आम्ही त्यावेळेला अनेक विमानं काबुलच्या विमानतळावर उड्डाण करताना आणि लँड करत असताना पाहत होतो. एक दिवस आम्हाला आदेश आला की आमच्या तुकडीला दिल्लीला जायचं आहे आणि हवाई दलाच्या मुख्यालयात आमचं ब्रिफींग होणार होतं. तिथे पोहचल्यानंतर आम्हाला अफगाणिस्तानात एका रेस्क्यू ऑपरेशनसाठी जावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी आम्हाला सांगितलं की आपलं अंतिम स्थळ हे मजार-ए-शरिफ आहे. त्यावेळी जो व्यक्ती आम्हाला ब्रिफींग देत होता त्याला मजार ए शरिफ हे ठिकाण नकाशावर नीट दाखवता येत नव्हतं. त्या काळात सध्याच्या जमान्यातील जीपीएस आणि इतर अद्ययावत यंत्रणा मदतीला नसायच्या.”










