दिल्लाची बादशाह अब्दुलशाह अब्दाली ते कंगना रणौत; भास्कर जाधव भाजपवर बरसले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषण करताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर परखड टीका केली. भाजपला शिवसेनेला संपवायचं आहे आणि म्हणून मराठी माणसांमध्ये लढाई लावून देत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केली. पानीपतच्या युद्धाचा दाखला देत जाधव यांनी भाजपची तुलना अहमदशाह अब्दालीशी तुलना केली.

काय म्हणाले भास्कर जाधव? (Bhaskar Jadhav)

भास्कर जाधव म्हणाले, “मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत आणि पुन्हा एकदा एकमेकांना मारणार आहेत. पानीपतमध्ये एका बाजूला सदाशिव भाऊ, दत्ताजी शिंदे उभे राहणार आहेत. दुसऱ्या बाजूला विश्वासराव उभे राहणार आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे -भास्कर जाधव

“पानीपतच्या युद्धामध्ये एका बाजूला ते (विरोधक) उभे आहेत. दुसऱ्या बाजूला अहमद शाह अब्दाली आणि पेशवे सदाशिवराव भाऊ, दत्ताजी शिंदे, विश्वासराव असतील एकमेकांच्या विरोधात लढताहेत आणि लढताहेत कुणासाठी तर दिल्लीच्या बादशाह करता लढत आहेत. दिल्लीचा बादशाह सहीसलामत राहिला आणि मरताहेत महाराष्ट्रातील मराठी, दिल्लीच्या तख्ताकरता. दिल्लीचे बादशाह बाजूला उभे आहेत आणि ते बादशाह म्हणजे तुम्ही आहात (भाजप),” असं भास्कर जाधव म्हणाले.

“काय सांगता की सत्तेकरता केलं नाही म्हणून सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक चाल, प्रत्येक कृती महाराष्ट्र सरकार उलथवून टाकण्याकरता होती. महाराष्ट्र सरकार… कोरोनासारखं संकट आलं. या संकटात महाराष्ट्राची एक परंपरा आहे. पूर्व इतिहास आहे. सत्ता कुणाची आहे, हे बघितलं जात नाही, तर महाराष्ट्र बाहेर कसा काढायचा यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदा लावून लढताना आणि या महाराष्ट्राला बाहेर काढताना या महाराष्ट्राने बघितलेत. त्याच काळात तुमची प्रत्येक कृती सरकार उलथवण्याची होती,” असा आरोप त्यांनी केला.

ADVERTISEMENT

Gulabrao Patil : “आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी उठाव केलाय, बंड नाही”

ADVERTISEMENT

“सकाळी सरकार पडेल, संध्याकाळी सरकार पडेल, पंधरा दिवसांनी सरकार पडेल. आता पडेल, मग पडेल. सत्तेसाठी नाही, असं का म्हणताहेत. तुम्ही कधी कुणाच्या हातात भोंगा दिलात. कधी कुणाच्या हातात हनुमान चालीसा दिलीत. कधी तुम्ही हिजाब महाराष्ट्रात आणलात. कधी तुम्ही नुपूर शर्मा महाराष्ट्रात आणली. कधी तुम्ही ती कंगना रणौत महाराष्ट्रात आणली. कधी तुम्ही सुशांतसिंह राजपूत महाराष्ट्रात आणलात आणि या महाराष्ट्राची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केलात.”

“सत्ता उलथवली गेली नाही. सत्ता उलथली गेली नाही. म्हणून मी एकनाथरावजी शिंदे मी तुमचं अभिनंदन करताना तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. या सगळ्यांमध्ये ज्या भाजपच्या हिंदुत्वाच्या गोष्टी तुम्ही करता आहात. ज्या भाजपच्या साधनसुचितेच्या गोष्टी तुम्ही करता आहात. ज्या भाजपच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी तुम्ही करत आहात. माझे मित्र दादा इथे बसलेत. संजय राठोड तुमच्या बाजूला बसलाय. त्यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात काय काय केलं?,” असं जाधव म्हणाले.

Trust Vote Live : नेत्यांच्या भाषणांची मुसळ’धार’! मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरू

“त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ म्हणून सांगितलं तेव्हा तुम्ही म्हणालात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू. बोला, संजय राठोडांचं काय करणार आहात. काय केलंत? प्रताप सरनाईकांना विचारा. त्यांना ईडीची चौकशी लावली. यामिनी जाधव… ईडीची चौकशी लावली. केंद्र सरकारने या चौकश्या लावल्या, पण नियती कुणाला सोडत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले.

“आज त्यांना घराखाली केंद्राचे पहारे देऊन वाचवावं लागतं. हा नियतीचा न्याय आहे. आता देवेंद्र फडणवीस काय बोलले, (सत्ताधारी बाकावरील सदस्यांकडून गोंधळ) मला माहितीये की माझं बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही. कारण वर्मावर घाव पडतोय. देवेंद्र म्हणाले, मला ज्या पक्षाने पद दिलंय, पण घरी बसायला सांगितलं असतं तरी मी बसलो असतो. खरा तो विषय नाही. खरा विषय असा आहे की, मला पक्षाने घरी बसायला सांगायला हवं होतं, पण अशी विटंबना करायला नको होती, असं त्यांचं म्हणणं आहे.”

“राष्ट्रवादी काँग्रेससोबत ८० तासांचं सरकार स्थापन केलं, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. ते यशस्वी झालं नाही, म्हणून ठिके. आज घराघरांत ईडी लावली. आज महाराष्ट्रात ईडी लावायला मराठी माणूस दिसतोय… अविनाश भोसले, संजय राऊत, प्रताप सरनाईक, यामिनी जाधवपासून सगळे मराठी माणसं. सगळ्या मराठी माणसांवर ईड्या…

“ती ईडी (एकनाथ आणि देवेद्र) नव्हे, तर ही ईडी (सक्त वसुली संचालनालय) फक्त मराठी माणसं. तुम्हाला सांगतो की, तुम्ही किती जणांना धुवून घेणार आहात?”

“प्रविण दरेकर, चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर, राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे पाटील, हार्दिक पटेल, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, राम कदम, प्रशांत पारिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, कृपासिंह, कपिल पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, हिना गावित, दत्ता मोघे, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, काशीराम पवार, माणिकराव गावित, भरत गावित, शिवाजीराव बाहिते, हर्षवर्धन बाहिते, तुषार राधे, सूर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, धनंजय महाडिक, रणजित राणा पाटील, प्रशांत धस, मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, निरंजन डावखरे, सागर मोघे, नमिता मुंदडा, विलासराव जगताप, रणजितसिंह, वैभव पिचड, मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर किती जणांना धुवून घ्याल?”

“मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, तुम्हाला हे लढवताहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना… रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. त्याठिकाणी घायाळ होतील, ते शिवसैनिक होतील. शिवसेना संपेल. यांचा २५ वर्षांचा इतिहास बघितलात, तर शिवसेना संपवनं हा एक कलमी कार्यक्रम आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT