लखीमपूर हिंसा : मृतांचा आकडा आठ वर, केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा आठवर पोहचला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात येतो आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अतिरीक्त पोलीस संचालक अरुण कुमार सिंग यांनी या प्रकारात मृतांचा आकडा आठवर गेल्याचं सांगितलं आहे. सुरुवातीला घडलेल्या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष उर्फ मोनू गेला होता. यावेळी आशिषच्या ताफ्यात असलेल्या गाड्या आणि आंदोलनकर्ते शेतकरी समोरासमोर आले. ज्यानंतर मोनूच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप केला जात आहे.

या प्रकारानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील तीन गाड्या पेटवून दिल्या. लखीमपूर मधील परिस्थिती बिघडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ADG प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल आपलं स्पष्टीकरण देत, लखीमपूरमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेशी संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय.

नेमकं घडलं तरी काय?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी तेनी गावात बनवीरमध्ये उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर ताबा मिळवत कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले असताना याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या हिंसाचारानंतर लखनऊचे IG लक्ष्मी सिंह यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली असून आजुबाजूच्या पोलीस ठाण्यांमधून अतिरीक्त कुमक मागवण्यात आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या घटनेनंतर अखिलेश यादव, जयंत चौधरी आणि अन्य विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT