राजकारण करु नका,प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे नको ! गडकरींचा भाजप नेत्यांना सल्ला
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रत्येक दिवशी आरोप-प्रत्यारोपाच्या नवीन फैरी पहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना आपल्याच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत. कोरोना काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही…लोकांना ते फारसं आवडत […]
ADVERTISEMENT

राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रत्येक दिवशी आरोप-प्रत्यारोपाच्या नवीन फैरी पहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना आपल्याच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत. कोरोना काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही…लोकांना ते फारसं आवडत नाही असं म्हणत गडकरींनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सल्ला दिला आहे.
“तुम्ही कोरोनाची परिस्थिती जेवढी हलक्यात घेताय तेवढी ती नाहीये. आता सर्वांनी काळजी घेणं गरजेची आहे. रस्त्याची, पुलाची जी कोणती काम असतील ती घरातून करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करा. पार्टीची काम महत्वाची आहेतच…पण जीव वाचला तर पुढे काही कराल ना. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही. लोकांना ते फारसं आवडत नाही. तुम्ही जे कराल त्याचं क्रेडीट तुम्हाला मिळणारच आहे. सध्याच्या घडीला मीडिया स्ट्राँग आहे की तुमचं काम पोहचतं. पण एखादा ऑक्सिजन सिलेंडर द्यायचा आणि ४-४ वेळा त्याचे फोटो पाठवायचे असं करु नका. तुम्ही करत असलेल्या सेवाकामाची इतरांना माहिती मिळणं इथपर्यंत ठीक आहे पण त्याचा बागुलबूवा करु नका”, असं म्हणत गडकरींनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना उपदेशाचा डोस पाजला आहे.
शिवसेनेसारखं काम कोणालाच जमलं नाही, म्हणून तिकडे चिता पेटल्या आहेत ! – संजय राऊत
यावेळी बोलत असताना गडकरींनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक जण भावनेच्या भरात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन काम करतात तसं करु नका. पहिले स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, त्यानंतर तुमच्या घरातली आर्थिक व्यवस्था योग्य राहिल याची काळजी घ्या आणि त्यानंतर समाजकामाला प्राधान्य द्या असं गडकरींनी सांगितलं. गेल्या काही काळात आपण अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे गमावले आहेत, आता आपल्याला कार्यकर्ते गमावून चालणार नाही असं म्हणत गडकरींनी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला परिस्थितीचं भान राखून वागण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकून राज्यात आता आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणं थांबतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
