‘सामना’ची सुत्रं पुन्हा उद्धव ठाकरेंकडे! संजय राऊतांच्या अटकेनंतर महत्त्वाचा बदल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतील बंडानंतर पक्षात विविध पातळ्यांवर बदल केले जात आहेत. त्यात आता ज्यातून शिवसेनेची भूमिका मांडली जाते, त्या दैनिक सामनाच्या संपादकपदीही बदल करण्यात आला आहे. कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक म्हणून काम बघत होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

शुक्रवारी सामनाच्या प्रिंटलाईनवर संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचं नाव छापून येत होतं. शुक्रवारी (५ ऑगस्ट) सामनाचे संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे सामनाची संपादकीय जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सामना संपादक : संजय राऊतांना अटक, जबाबदारी रश्मी ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंकडे

संजय राऊत हे शिवसेना नेते आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे शिवसेना मुख्य प्रवक्ते पदाची तसेच सामनाच्या कार्यकारी संपादक पदाचीही जबाबदारी आहे. संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ईडीने अटक केली. संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या अटकेनंतर सामनात हा मोठा बदल करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर रश्मी ठाकरे बनल्या होत्या सामनाच्या संपादक

२०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सामनाच्या संपादक पदाची सुत्रं काही दिवस संजय राऊत यांच्याकडे होती. त्यानंतर रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक बनल्या होत्या.

ADVERTISEMENT

२०१९ मध्ये रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक बनल्यानंतर याकडे राजकीय दृष्टीने महत्त्वाची घटना म्हणून बघितलं गेलं होतं. रश्मी ठाकरे यांच्यानिमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील महिलेनं सामनाच्या संपादकपदाची धुरा सांभाळली होती.

ADVERTISEMENT

सामनाच्या प्रिंटलाईनवर आता संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. दुसरीकडे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांचं नाव आहे. सामनातून सातत्यानं अग्रलेखातून शिवसेनेची भूमिका मांडली जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सामना अग्रलेखाची चर्चा होत असते.

बाळासाहेब ठाकरे हे सामनाचे संस्थापक संपादक असून, मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रकाशित होते. सामनाची सुरूवात २४ जानेवारी १९८८ रोजी झाली होती, तर २३ फेब्रुवारी १९९३ पासून दोपहर का सामना हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT