
मुंबई: शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे याचं पुणे-मुंबई महामार्गावार अपघाती निधन झालं. पहाटे मुंबईकडे येत असताना पनवेलजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला, त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आता विनायक मेटेंच्या निधनानंतर पुन्हा एकदा मुंबई-पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची चर्चा होऊ लागली आहे. कारण आतापर्यंत अनेक दिग्गजांनी या महामार्गावर आपला जीव गमावला आहे.
प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या गाडीचा 2012 मध्ये अपघात झाला होता. यामध्ये आनंद अभ्यंकर (50) आणि अक्षय पेंडसे (33) असे मृत झालेल्या अभिनेत्यांची नावं होती.
बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात करणाऱ्या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे यांचाही पुणे-मुंबई महामार्गावरती 12 फेब्रुवारी 2001 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्या वाई येथून मुंबईला परतत होत्या. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती.
2012 मध्ये असाच एक अपघात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला होता. त्यामध्ये दोन टेलिव्हिजन कलाकारांचा मृत्यू झाला होता तर सहा जण जखमी झाले होते. बोरिवलीचे रहिवासी अभिजित सतीश वायदंडे (30) आणि विक्रोळी दीप्ती प्रमोद तावडे (23) यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर डोंबिवलीचे रहिवासी असलेला राहुल पेडणेकर (30), सुयोग भालेराव (28) आणि वैष्णवी पोटे (22) हे किरकोळ जखमी झाले होते. हे पाचही जण एका टीव्ही सीरियलच्या शूटिंगसाठी पुणे शहरात गेले होते.
अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीलाही काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता, त्यात ते थोडक्यात बचावले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भाताण बोगद्याजवळ त्यांच्या अपघात झाला होता. 36 वर्षीय संग्राम जगताप हे त्यांच्या ड्रायव्हर आणि कारमधील इतर दोन जणांसह मुंबईला जात असताना पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला होता.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामध्ये भीषण, गंभीर अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. महामार्गावर 2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 714 अपघात झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 207 अपघात भीषण आणि गंभीर स्वरूपाचे आहेत. यामध्ये 246 जणांचा मृत्यू तर 387 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सुमारे 62 किरकोळ अपघात झाले आहेत.