Andheri By Poll : अंधेरीची जागा काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडायची होती का? शंका घेण्यासारखी स्थिती : केसरकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लटके यांची उमेदवारी आता अंतिम झाली असून त्या उद्या सकाळी अर्ज भरणार असल्याची माहिती आमदार अनिल परब यांनी दिली.

दरम्यान लटके यांच्या उमेदवारीवरील निकालनंतरही अद्याप आरोप-प्रत्यारोपांचं वादळं शांत होताना दिसून येत नाही. लटके यांचा राजीनामा स्वीकारु नये यासाठी सरकारचा दबाव होता असा आरोप बुधवारी अनिल परब यांनी केला होता. न्यायालयाच्या निकालावर आणि परब यांच्या आरोपांवर बोलताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या गोष्टीशी आमचा काहीही संबंध नसून ठाकरेंकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले?

तुम्हाला माहित नव्हतं का राजीनामा देण्याची प्रक्रिया काय आहे? उशीरा अर्ज करायचा आणि मग आम्हाला परवानगी मिळाली नाही, दिली नाही म्हणून उच्च न्यायालयात जायचं हा नेहमीचा प्रकार झाला आहे. गतवेळी देखील चिन्ह गोठवण्याच्या आधी चारवेळा वेळ त्यांनीच मागितली. चिन्ह गोठवल्यावर मात्र आमच्यावर आरोप सुरु झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता सुद्धा राजीनामा स्वीकारताना “तो स्वीकारु नका” असं आम्ही कोणालाही सांगितलं नव्हतं. राजीनामा स्वीकारताना एक प्रक्रिया असते आणि ती पाळली जाते याची पूर्ण कल्पना त्यांना होती. वेळेत काही गोष्टी करायच्या नाहीत आणि यंत्रणांकडून वेळ झाला की आम्हीच तो वेळ करायला लावतो, असं भासावायचं हे सर्व सहानुभूती मिळविण्यासाठी आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे.

जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडायची होती का?

एखादा उमेदवार असला तर निवडणुकीत काही फरक पडतो असं नसतं. परंतु त्यांना जर हाच उमेदवार द्यायचा होता तर उमेदवार निवडण्यासाठी वेळ का केला? त्यांना ही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायची होती का? अशी शंका घेण्याची परिस्थिती आहे. त्यांना जर स्वतः ही जागा लढवायची होती आणि उमेदवारही अंतिम होता तर तुम्ही दोन-तीन महिने आधी तयारी का सुरु केली नाही? वेळेत राजीनाम्यासाठी अर्ज का दिला नाही? सोबतच केवळ राजीनामा देऊन काम पूर्ण होत नसते. संपत्तीचं विवरण द्यावं लागतं. बाकीची शपथपत्र द्यावी लागतात.

ADVERTISEMENT

लटके यांच्यावर बुधवारी दाखल झालेल्या तक्रारीबाबत विचारले असता, केसरकर म्हणाले, या गोष्टीशी आमचा काहीही संबंध नाही. त्या डिपार्टमेंटने तपासायच्या असतात. तुम्ही शासकीय नोकर आहात, आणि शासकीय नोकरीत असताना जी काही तपासणी करावी लागते ती प्रक्रिया सर्वांनाच माहिती असते. शासकीय, निमशासकीय नोकरीतील व्यक्तीला निवडणुकीला उभं करताना सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे का? हे पाहणं त्या त्या पक्षाचं काम असतं. आम्ही असं कोणालाही सांगत नाही की यांच्याविरोधात तक्रार करा, परंतु अशी काही तक्रार असेल तर त्याची शहानिशा नंतरही होऊ शकते, असंही केसरकर म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT