महाराष्ट्र भूषण : सरकार की धर्माधिकारी, कार्यक्रमाची वेळ कुणी ठरवली?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा सध्या वादात सापडला आहे. त्याच कारण म्हणजे या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेले 12 श्रीसदस्य.
ADVERTISEMENT

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी (16 एप्रिल) खारघर येथील भव्य सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, हा पुरस्कार सोहळा सध्या वादात सापडला आहे. त्याच कारण म्हणजे या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेले 12 श्रीसदस्य. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो श्रीसदस्य आले होते. पण हा सोहळा भर उन्हात पार पडला, यात उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण 100 जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे. (Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan award controversy 12 died due to heatstroke)
यानंतर विरोधकांनी सरकारवर आरोप सुरु केले असून या सोहळ्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत. काल महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचारार्थ रुग्णांची विचारपूस केली. यानंतर ठाकरे आणि पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाची वेळ चुकली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
कार्यक्रमाच्या वेळेवरुन काय म्हणाले विरोधक?
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ कुणी दिली? कशी दिली? आणि ढिसाळ नियोजन, ही घटना दुर्दैवी आहे. अमित शाहांना सायंकाळी गोव्यात कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम सकाळी ठेवण्यात आला आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलं? कोणत्या स्तरावरची चौकशी झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, “चौकशी करतील की नाही, कल्पना नाही. जसं तुम्ही म्हणालात की अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल, तर चौकशी कोण कुणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. पण, तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली असेल, तर खरंच खूप विचित्र प्रकार आहे.”
‘मतांच्या राजकारणासाठी एका संताचा…’, जितेंद्र आव्हाड शिंदे-फडणवीसांवर बरसले
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, उन्हाळा प्रचंड आहे आणि असं असताना दुपारची वेळ निवडणं, हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. चूक दुरुस्त वगैरे चर्चा करून चालणार नाही. मृत्यू झालेल्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. जे उपचार घेताहेत ते लवकर बरे होवोत. आतापर्यंत किती जखमी आहेत, किती उपचार घेताहेत, किती लोकांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडलं, किती जण मृत्यूमुखी पडलेत, हा निश्चित आकडा कळायला मार्ग नाही. या कार्यक्रमाची वेळ चुकली. संध्याकाळची असती, तर अधिक बरं झालं असतं. एप्रिल मे मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत”, असंही त्यांनी सांगितलं.