KDMC मध्ये प्रचंड पोलीस फौजफाटा कशासाठी? प्रशासनाला 'या' गोष्टीची प्रचंड भीती
केडीएमसी महासभेसाठी कडक पोलिस बंदोबस्ताचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 16 मार्च रोजी सभेसाठी जो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. मात्र तरीही प्रशासन आगामी महासभेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यावर ठाम आहेत.
ADVERTISEMENT

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (KDMC) अनेक नगरसेवकांवर गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी झालेल्या महासभांमध्ये नगरसेवकांमध्ये जोरदार वाद, धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे, तर नगरसेवकांचे समर्थक आणि बॉडीगार्ड यांच्यातही संघर्ष झालेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने महासभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महासभेत नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ज्यासाठी आज पुन्हा महापालिकेत पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाची बैठक झाली.
KDMC मध्ये का भासतेय पोलीस बंदोबस्ताची गरज?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी महासभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली असून, या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचे सखोल पुनरावलोकन करण्यात आले.
हे ही वाचा>> मामीसोबत अनैतिक संबंध... बहिणीसोबत लग्न आणि सासू-मेव्हण्याची हत्या, पार चक्रावून टाकणारी कहाणी
2026 निवडणुकीनंतर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे आणि भाजपचे नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्यात वाद झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे आगामी महासभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
16 मार्च रोजी झालेल्या सभेत काही नगरसेवकांनी पोलीस बंदोबस्तावर आक्षेप घेतला होता. मात्र, महासभांमधील राड्याचा इतिहास लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी मुख्यालयाची पाहणी करून प्रवेशद्वार, सभागृह परिसर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली आहे. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.










