Maharashtra Politics : बाळासाहेबांनी रात्रीत डाव फिरवला अन् देवरा…; शिवसेनेचा ‘तो’ किस्सा
बाळासाहेब ठाकरेंनी वेगळी भूमिका घेत कसा दिला होता काँग्रेसला पाठिंबा. मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत काय घडलं होतं?
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Balasaheb Thackeray : महाराष्ट्राचं राजकारण २०१९ मध्ये पूर्णच बदलून गेलं. जे सगळ्यांना अशक्य वाटतं होतं, ते घडलं. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. पण, हे काँग्रेस-शिवसेनेतील सख्ख्यं पहिल्यांदाच झालं नाही. यापूर्वीही अनेकदा असं घडलंय, ज्यावेळी शिवसेनेनं काँग्रेसला मदत केलीये. इतकंच काय तर एकदा बाळासाहेब ठाकरे मदत केल्याने मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले. बाळासाहेबांनी रात्रीतून डाव फिरवल्याने हे घडलं होतं आणि त्यामुळे हेमचंद्र गुप्ते हे शिवसेना सोडून गेले.
1977 मध्ये काय घडलं होतं?
मुंबई महापालिका महापौर पदाची निवडणूक जाहीर झाली. १९७७ च्या या निवडणुकीबद्दलचा एक किस्सा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या जय महाराष्ट्र या पुस्तकात सांगितलेला आहे. तो असा…
“मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक १९७७ मध्ये जाहीर झाली. तेव्हा धोरण ठरवण्यासाठी झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत सर्वच नेत्यांचं मत विरोधी पक्षीय उमेदवार आणि समाजवादी नेते सोहनसिंग कोहली यांना पाठिंबा द्यावा, असंच होतं.”
हेही वाचा >> ‘राम दर्शनासाठी अयोध्येला येईन, पण…’; पवारांनी भूमिका केली जाहीर
“याच बैठकीस उपस्थित असलेल्या काही नेत्यांच्या स्मृतीनुसार केवळ ठाकरे यांनी एकट्याने काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांच्या नावाचा आग्रह धरला. सेनाप्रमुखांच्या भूमिकेविरोधात त्या रात्री अन्य सर्व नेते एकत्र आल्याचे बघून ठाकरे यांनी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्याकडे सुपूर्द केले.”
हेही वाचा >> काँग्रेस आंबेडकरांच्या कात्रीत! ‘न्याय यात्रे’त सहभागी होणार, पण ‘या’ अटीवर
“डॉ. गुप्ते आणि अन्य नेत्यांचा निर्णय तर झालेलाच होता. त्यांचा कौल हा कोहली यांच्याच बाजूने होता; पण मध्यरात्री ‘मातोश्री’ बंगल्यावर ही बैठक आटोपल्यानंतर ठाकरे यांनी देवरा यांची उमेदवारी हा स्वत:च्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि सेना नगरसेवकांना काँग्रेसच्या म्हणजेच देवरा यांच्या पारड्यात आपली मतं टाकायला लावली. देवरा विजयी झाले त्याच क्षणी डॉ. गुप्ते यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”