
Udayanraje Bhonsle: सातारा: कर्नाटक (Karnataka) सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. पण आता भाजपचेच खासदार उदयनराजे भोसलेंना (BJP MP Udayanraje Bhonsle) अमित शाहांची मध्यस्थी मान्य नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 'तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्थी करणे गरजेचे होतं.' असं थेट विधान उदयनराजेंनी केलं आहे. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. (bjp mp udayanraje bhosale does not agree with home minister amit shahs mediation)
खासदार उदयनराजे भोसले यांनी कर्नाटक सीमाबाबद बोलताना म्हटलं की, 'भाषावार रचना होण अपेक्षित होतं पण झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली त्यांना जमलं नाही, त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती. पण तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करणे गरजेचे होते.'
'पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील प्रमुख यांना निमंत्रित केलं पाहिजे. सीमेवर राहणाऱ्या लोकांचा विचार करणार आहात की नाही? राजकारणी लोकांची माणुसकी संपुष्टातच आली आहे.' असं म्हणत उदयनराजेंनी भाजपलाच घरचा आहेर देऊन टाकला आहे.
दरम्यान, याचवेळी उदयनराजेंनी आपल्याच सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'राज्यामध्ये अल्पवयीन युवतींवर अत्याचार होत असून हे कसं थांबवणार? राज्यात कायदा शिल्लक राहिला आहे का? लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. कायदे कडक केले पाहिजे तेव्हा हे आटोक्यात येईल. स्त्रियांना जपण्याचे काम तरी करा.'
'बलात्काराचा गुन्हा करणारे धनदांडगे पैशाच्या जोरावर वकील, पोलीस खरेदी करतात. त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत. आपल्याकडे सुध्दा तसे कडक कायदे करा, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटली जातील, बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटा पण आपल्या महिलांना जपा.' असे खडेबोलच उदयनराजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहेत.
'महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई येथे 17 तारखेला मोर्चाचे आयोजित केले आहेत. मला जी काय पावलं उचलायची होती, ती मी उचलली आहेत. हा मुद्दा जर मी या वेळेस लावून धरला नसता तर कर्नाटक सीमावाद हा विषय केव्हाच साईड ट्रॅक झाला असता.' असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.