
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा हे दोघे दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. किमान या दौऱ्यावरून परत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरेल अशी अपेक्षा केली जाते आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याच्या बातम्या शुक्रवारीही आल्या होत्या.
महाराष्ट्रात जो राजकीय भूकंप २१ जूनला झाला त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. मात्र ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अद्याप काही नव्या सरकारला सापडत नाही. कारण शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यात नवं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ८ ऑगस्टला याबबत सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणवीर पडल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत.
५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र तो मुहूर्तही टळला. आता नवी तारीख कळणार का हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीहून आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. रविवापर्यंत म्हणजेच ७ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात विस्तार लांबणीवर पडला आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत सुमारे २० ते २२ वेळा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी विकासकामं ठप्प झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरचा कामाचा भार वाढल्याने ते आजारी पडले आहेत असा टोला आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर कामांची विभागणी झाली असती, पालकमंत्र्यांच्या नेमणुका झाल्या असत्या तर कामं वाटली गेली असती. ४२ मंत्र्यांच्या नेमणुका झाल्या असत्या तर लोकांचे प्रश्न मार्गी लागले असते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.