
सांगलीच्या साधू मारहाण प्रकरणाची बातमी समजताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन केला. रशियावरून संपर्क साधत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी माहिती घेतली आणि या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
सांगलीतल्या जत तालुक्यातल्या लवंगा गावात राहणाऱ्या चार साधूंना मारहाण करण्यात आली. हे साधू म्हणजे मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आल्यावरून हा प्रकार घडला. यामुळे मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणातही याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. या घटनेची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस यांनी थेट रशियाहून पोलीस महासंचालकांना फोनवरून संपर्क साधला. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मॉस्कोतील पुतळ्याच्या अनावरणासाठी तिथे गेले आहेत. त्यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी रशियाहून पोलिसांना फोन केला.
जतच्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली आणि नंतर कळले की, हे सगळे साधू मथुरा, उत्तर प्रदेश येथील पंच दशनाम पुराण आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री गर्वागिरी महाराज आणि कर्नाटकात तीर्थयात्रेसाठी गेलेले त्यांचे शिष्य आहेत. ते विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी जात होते आणि ते ऋषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची आधारकार्डही तपासण्यात आली आणि त्यांच्या नातेवाईकांशीही पोलिसांकडून बोलणे झाले आहे. आतापर्यंत या साधूंनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पालघरच्या घटनेची आठवण करुन देत भाजपवरती टीका केली आहे. ''पालघर साधू हत्याकांडात भाजपाच्या सत्तेतील गावातील भाजपा पदाधिकारी होते. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवेतून हत्या झाली असतानाही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपाने मविआची हिंदू विरोधी म्हणून बदनामी केली. त्याच अफवेतून जतमध्ये साधूंना मारहाण झाली. आता सरकार कोणाचे? सीबीआयकडे केस देणार का?'' असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
१६ एप्रिल २०२० रोजी डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील गडचिंचले येथील वनविभागाच्या चेकनाक्याजवळ एका इको कार मधून आलेल्या सुशीलगिरी महाराज, चिकने महाराज कल्पवृक्ष गिरी आणि त्यांच्या कारचा चालक निलेश तेलगडे ह्यांची जमावाने हत्या केली होती. ह्या प्रकरणी पोलिसांवर "स्लॅक सुपरव्हिजन"चा ठपका ठेवीत तत्कालीन पोलीस अधीक्षक ह्यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत नंतर त्यांची बदली करण्यात आली होती. आता काल ऋषींना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ पाहता पालघर सारखी घटना टळली असं म्हणता येईल.