
अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Ran) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुंबईत आल्यानंतर थेट उद्धव ठाकरेंच्या घरासमोरच हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर बराच राजकीय राडा रंगला होता. याच प्रकरणात नवनीत आणि रवी राणा या दोघांनाही अटक करण्यात आली होती. दरम्यान, दोघंही जामीनावर बाहेर आले असून, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दोघांची भेट घेतली.
जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा या पाठीच्या त्रासामुळे नवनीत राणा यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नवनीत राणांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी ही टीका केली आहे.
काय म्हणाल्या आहेत चित्रा वाघ?
"खासदार नवनीत राणा यांची आज लीलावती इस्पितळात भेट घेतली.एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले आणि मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकारने."
चित्रा वाघ यांच्याआधी किरीट सोमय्या यांनीही लीलावती रूग्णालयात जाऊन भेट घेतली. किरीट सोमय्या यांनीही नवनीत आणि रवी राणा यांची चौकशी केली. राणा दाम्पत्याला तुरुंगात जो अनुभव आला तो ऐकून मला धक्काच बसला. मला तो अनुभव ऐकून ब्रिटिशांच्या काळाची आठवण झाली असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सरकारविरोधात कट केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात १२४ अ च्या अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याबाबत कोर्टाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असून राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम १२४ अ हे चुकीचं आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे.