…म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याबद्दल प्रथमच भाष्य केलं. शिवसेनेचे आमदार शिंदेंसोबत गेल्यामुळे आपणही गेलो, असं ते एका कार्यक्रमात म्हणाले.
ADVERTISEMENT

शिवसेनेतील फूट आणि नंतर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी पहिल्यांदाच सडेतोड भाष्य केलं. 1987 चा किस्सा सांगत गुलाबराव पाटलांनी त्यांची आमदारकी जाण्यची भीतीही बोलून दाखवली. मंत्रिपद सोडलं होतं, पण आकडा जुळला नसता, तर आमदारकीही गेली असती, असं पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांच्या भाषणाची आता जोरात चर्चा सुरू आहे. ()
गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात ठाकरेंची साथ सोडून जाण्याबद्दल प्रथमच भाष्य केलं आहे. “लोकांनी आम्हाला गद्दारी केली म्हटलं. मी 33वा होतो, माझ्या आधी 32 लोक गेले होते. जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते. पाच पैकी चार माझ्याआधी पळून गेले. मी एकटा राहिलो. नंतर नागपूरचाही पळून गेला. बुलढाणावालेही गेले. नाशिकचेही गेले. दादरचेही गेले. ठाण्याचेही गेले. राहिलो मी एकटा. म्हणजे नागपूर ते मुंबई मी एकटा राहिलो होतो.”
ठाकरेंची साथ का सोडली? गुलाबरावांनी स्पष्ट सांगितलं
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी आधी बंडखोरी केली होती. त्यानंतर एक एक आमदार ठाकरेंची साथ सोडून गेले. गुलाबराव पाटील यांचा 33 वा क्रमांक होता. या सगळ्यावर बोलताना पाटील म्हणाले, “काय केलं असतं मी? एवढी काम झाली असती का? मी विचार केला की, चार गेले. चारही खांदे गेले तर मी काय करू? मग मीही गेलो. नंतर माझ्यावर टीका सुरू झाली, काय झाडी, काय डोंगर,… पण जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये ही जी कामं होताहेत, ती एवढी कामं आपल्या मतदारसंघात झाली नसती.”
बाळासाहेबांची शिकवण… 1987 किस्सा काय?
गुलाबराव पाटील यांनी यावेळी शिवसेनेचं सदस्य स्वीकारातानाची आठवणही सांगितली. त्याचबरोबर बाळासाहेबांनी शिवसेनेचा सांगितलेला अर्थही त्यांनी उपस्थितांना ऐकवला. “मी 1987 मध्ये शिवसैनिक झालो. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला हेच शिकवलं की, मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी असलेली… शि म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे नामर्दांना जिथे स्थान नाही, ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना”, असं ते म्हणाले.