Maratha Morcha : “हा जनरल डायर कोण?”, शिवसेनेचं (UBT) शिंदेंना चॅलेंज
Maratha Morcha Latest news : आंतरवाली सराटी गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट सवाल केला आहे.
ADVERTISEMENT

Maratha Morcha Lathi charge : आंतरवाली सराटी गावात घडलेल्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत शिवसेनेने (युबीटी) शिंदे सरकारवर हल्ला चढवला. ‘आंतरवालीत जालियनवाला, हा जनरल डायर कोण?’, असा सवाल करत पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि गोळीबाराच्या घटनेवर भाष्य केले आहे.
सामना अग्रलेखात शिवसेनेने म्हटलं आहे की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या न्याय्य मागणीची तड तर लागत नाहीच; पण या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला व गोळीबार करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे राक्षसी कृत्य राज्यातील मिंधे-फडणवीसांच्या ट्रिपल इंजिन सरकारने केले आहे.”
“पोलिसांनी केलेला लाठीहल्ला इतका बेछूट होता की, आपण निरपराध महिला, मुले व वयोवृद्धांची डोकी फोडतोय, याचेही भान पोलिसांना राहिले नाही. स्वातंत्र्यलढय़ात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी असा हा राक्षसी हल्ला होता. पोलिसांनी आंतरवालीमध्ये बळाचा जो अतिरेकी वापर केला, तो पाहता राज्यातील मिंधे सरकारला व फडणवीसांच्या गृहखात्यालाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करायची आहे काय? असा प्रश्न शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला व महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला आहे”, असे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटले आहे.
आधी लाडीगोडी लावले, नंतर…
शिवसेनेने अग्रलेखात काही लाठीमार होण्याआधीचा घटनाक्रमही सांगितला आहे. अग्रलेखात म्हटलंय की, “मराठवाड्यातील मराठा समाजाला निजाम राजवटीत आरक्षण मिळत होते. ते आरक्षण परत मिळवून द्यावे, ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी होती व पोलिसांनी घडवलेल्या हिंसाचारानंतरही याच मागणीसाठी अजूनही हे उपोषण सुरू आहे. मिंधे सरकारने या मागणीसंदर्भात एक समिती नेमली आहे; पण या समितीची बैठकही होत नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते.”