'अंबरनाथमध्ये आम्ही शिंदेंसोबतच जायला हवं होतं, पण...', काँग्रेससोबतच्या युतीवर CM फडणवीसांचं मोठं विधान
CM Devendra Fadnavis: अंबरनाथमध्ये भाजपने बहुमतासाठी सुरुवातीला काँग्रेसशी युती केली होती. ज्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीनंतर भाजपने अत्यंत चक्रावून टाकणारा असा निर्णय भाजपने घेतला. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला होता. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. कारण अटीतटीच्या लढाईत भाजपने आपला नगराध्यक्ष निवडून आणला होता. पण असं असलं तरी अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले होते. मात्र सभागृहातील बहुमताच्या आकड्यापासून (30 नगरसेवक) ते दूर राहिले. अशावेळी बहुमतासाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण सर्वांचा अंदाज चुकवत अंबरनाथमध्ये भाजपने जी खेळी केली त्याची चर्चा केवळ राज्यातच नाही तर देशभरात सुरू झाली. ती खेळी म्हणजे भाजपची चक्क काँग्रेससोबतची युती.
जेव्हा याबाबतची माहिती समोर आली तेव्हा भाजपवर प्रचंड टीका सुरू झाली. दुसरीकडे काँग्रेसने अंबरनाथमधील 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आज (8 जानेवारी) तात्काळ काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. पण याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'आज तक'च्या मंथनमध्ये थेट सवाल विचारण्यात आला.
हे ही वाचा>> अकोल्यात AIMIM सोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपची युती, आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आम्ही त्यांना सोबत घेऊन तिथे बहुमत तयार करायला हवं होतं. पण स्थानिक नेत्यांचे असणारे मतभेद त्या मतभेदांचा हा परिणाम होता की, त्यांनी त्यांच्यासोबत युती केली नाही.'
पाहा देवेंद्र फडणवीस म्हणाले नेमकं काय म्हणाले भाजप-काँग्रेस युतीबाबत.
'ही बिल्कुल चुकीची गोष्ट आहे. काँग्रेससोबत कोणतीही हात-मिळवणी केलेली नाही. काँग्रेसचे 12 नगरसेवक हे भाजपमध्ये आले आहेत. आम्ही त्यांना भाजपमध्ये घेतलं आहे. त्यांनी काँग्रेस सोडली. जर कोणाला काँग्रेसमधून भाजपमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांना का रोखू? तसाही हा स्थानिक पातळीवरचा निर्णय होता. जिथवर माझं मत म्हणाल तर आम्ही शिंदेंसोबतच जायला हवं होतं तिथे. पण अनेकदा जी छोटी शहरं असतात.. इथे भलेही वर आमची युती असेल. पण तिथे छोट्या शहरांमध्ये दोन नेत्यांमध्ये मतभेद असतात. त्याच मतभेदांचा हा परिणाम होता.'










