नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. विरोधी बाकावरील काही पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. “हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’ असे मोदींचे धोरण आहे”, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाने हल्ला चढवला.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. “भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे. लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे. दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न”, अशा शब्दात ठाकरे गटाने खडेबोल सुनावले आहेत.
हेही वाचा >> Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!
राष्ट्रपतींच्या हस्त उद्घाटन करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरून ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे. “उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे”, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.
संसद भवन नावावर करून घेतले का?
“नटवरलाल नावाच्या एका भामटय़ाने संसद भवन, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. तसे हे नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करून घेतले आहे काय? संसद भवन व त्यावरील सिंहाची तीन तोंडे म्हणजे भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे, पण या सिंहांनी गर्जना करू नये, रौद्ररूप धारण करू नये असे श्रीमान पंतप्रधानांना वाटत आहे”, असा टोला ठाकरे गटाने मोदींना लगावला आहे.
हेही वाचा >> Maharashtra Politics : बच्चू कडूंचं जे झालं, तेच आता रवी राणांचंही होणार?
“पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना दिले नाही, असे काँग्रेस, शिवसेनेसह 20 राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील भाजप भजनी मंडळातील टाळकुट्यांनाही यानिमित्ताने कंठ फुटला आहे. शिवसेनेने उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला, पण श्रीमान उद्धव ठाकरे यांना बोलवतेच कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपला आजचे ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले, त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले काय? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे ते आधी सांगा. जेथे देशाच्या राष्ट्रपतींनाच उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण नाही, तेथे तुम्हा-आम्हाला निमंत्रण असले किंवा नसले काय, काय फरक पडतोय?”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन, देवेंद्र फडणवीसांनाही टोला
“राष्ट्रपतींच्या अपमानाबद्दल फडणवीस यांनी बोलावे. संविधान, नैतिकतेची जी पायमल्ली चालली आहे, त्यावर बोलावे. लोकशाहीत विरोधी पक्षांच्या भूमिकेस महत्त्व नसेल तर ती लोकशाही काय चाटायची आहे?”, असं टीकास्त्र फडणवीसांवर डागलं आहे.
हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?
“पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे दिमाखदार उद्घाटन झाले तसे नव्या संसद भवनाचे उद्घाटन होईल. संसदेत विरोधी पक्षनेत्याचे स्थान पंतप्रधानांच्या बरोबरीने असते. निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पहा”, असं म्हणत मोदी आणि भाजपला डिवचलं आहे.