निवडणूक गुजरातची, सुट्टी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये : शिंदे सरकारने काढला आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Deepak Kesarkar told the reason why Chief Minister Eknath Shinde went on a 3-day vacation.
Deepak Kesarkar told the reason why Chief Minister Eknath Shinde went on a 3-day vacation.
social share
google news

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला.

काय आहे या आदेशामध्ये?

या निर्णयानुसार, महाराष्ट्रात राहणाऱ्या मतदारांना गुजरात निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे. चार जिल्ह्यांतल्या मतदारांना भर पगारी ही सुट्टी देण्यात येणार आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या गुजरात सीमेवरील जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा सुट्टी आदेश उद्योग, ऊर्जा, कामगार विभागांतर्गत येणारे सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था तसंच औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमध्ये लागू असणार आहे. तसंच अपवादात्मक स्थितीतील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी.

१ डिसेंबर ५ डिसेंबर या दोन दिवशी मतदान आहे. संबंधितांना योग्य दिवशी सुट्टी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सवलत न मिळाल्याने कोणी मतदानापासून वंचित राहिल्याची तक्रार आली, तर संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शिंदे सरकारच्या या निर्णयाची चर्चा :

मात्र दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारच्या या निर्णयाबाबत चर्चा असून एक प्रश्नही विचारला जात आहे. विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नोकरदार मंडळींना मतदान करता यावं म्हणून संबंधित राज्यात मतदानादिवशी सुट्टी किंवा 2 तासांची सवलत दिली जाते. मात्र दुसऱ्या एखाद्या राज्यातील निवडणुकीच्या मतदानाला अशी सुट्टी देणं ही परंपरा आहे की शिंदे सरकारनं आपला विशेषाधिकार वापरला आहे, याबाबत सध्या प्रश्न विचारला जात आहे.

परंपरा की नवी सुरुवात :

सुट्टी किंवा सवलत देण्याचा हा आदेश म्हणजे नवी सुरुवात आहे की जुनी परंपरा आहे, याबद्दल कोणतीही माहिती या परिपत्रकात देण्यात आली नाही. त्यामुळेच खास गुजरातसाठी सरकारने ही सवलत दिली आहे का? मुंबई-महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातले लोक कामासाठी येतात, तेव्हा तिथल्या निवडणुकीसाठीही सुट्टी देणार का, दिली जाते का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

यासंदर्भातच माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, एखाद्या राज्यात सार्वत्रिक निवडणूक असेल तर शेजारच्या राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांत मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत दिली जाते. मतदानापासून कुणी वंचित राहु नये म्हणून निवडणूक आयोग काळजी घेते. गोव्यामध्ये निवडणूक होती, तेव्हा शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुट्टी, सवलत देण्यात आली होती. कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश इथल्या निवडणुकांवेळीही ही गोष्ट घडत असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT