PM Modi: ‘अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ’, पंतप्रधान मोदी लोकसभेत असं का म्हणाले?
अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना केलं आहे. पाहा नरेंद्र मोदी नेमकं काय-काय म्हणाले.
ADVERTISEMENT

PM Modi Speech: नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन लोकसभेत (Lok Sabha) अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. ज्यानंतर मागील तीन दिवसांपासून सभागृहात चर्चा सुरू आहे. याच चर्चेतील आता बहुप्रतिक्षित क्षण आला आहे. अविश्वास प्रस्तावावर भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, ‘देशातील जनतेने वारंवार आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. मी आज देशातील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजर झालो आहे. असे म्हणतात की देव खूप दयाळू आहे आणि देवाची इच्छा आहे की तो कोणाच्या ना कोणत्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करतो, कोणालातरी माध्यम बनवतो. देवाने विरोधकांना सुचविले आणि त्यांनी ‘तो’ प्रस्ताव आणला हा मी देवाचा आशीर्वाद मानतो.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी अविश्वास प्रस्ताव शुभ असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. (pm narendra modi said oppositions no confidence motion is auspicious for us read big things of modi speech in lok sabha)
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘2018 मध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हाही हा देवाचा आदेश होता. त्यावेळीही मी म्हणालो होतो की, अविश्वास प्रस्ताव ही आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, तर ती त्यांची फ्लोअर टेस्ट आहे. मतदान झाले तेव्हा विरोधकांकडे जेवढी मते होती, तेवढी मतेही त्यांना जमा करता आली नाही. एवढेच नाही तर जेव्हा आपण सर्वजण जनतेत गेलो तेव्हा जनतेनेही पूर्ण ताकदीने त्यांच्यावर अविश्वास जाहीर केला आणि निवडणुकीत एनडीएला जास्त जागा मिळाल्या आणि भाजपलाही जास्त जागा मिळाल्या. म्हणजेच एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आपल्यासाठी शुभच आहे.’
हे ही वाचा >> Amol Kolhe: ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’, अमोल कोल्हेंनी लोकसभा दणाणून सोडली!
मोदी पुढे म्हणाले की, ‘तुम्ही (विरोधक) 2024 च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजपचे सर्व जुने विक्रम मोडून काढतील आणि जनतेच्या आशीर्वादाने भव्य विजय मिळवून परत येण्याचा निर्णय घेतल्याचे मला दिसत आहे. विरोधकांच्या प्रस्तावावर येथे तीन दिवस विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी गांभीर्याने सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला असता तर बरे झाले असते. यापूर्वी आमच्या दोन्ही सभागृहांनी येथे अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर केली आहेत.
‘इथून शतकं झळकावत आहोत, तिथून नो-बॉल फेकत आहे’
विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुम्हाला गरिबांच्या भुकेची चिंता नाही, सत्तेची भूक तुमच्या मनावर आहे. तुम्हाला देशातील तरुणांची पर्वा नाही. तुम्हाला तुमच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. तुम्ही (विरोधक) खोटे आहात. तुम्ही या अविश्वास प्रस्तावावर कशी चर्चा केली? तुमचे दरबारीही फार दुःखी आहेत. ही तुमची अवस्था आहे. या चर्चेची गंमत म्हणजे विरोधी पक्षाने फिल्डिंग लावली होती, मात्र इथून चौकार-षटकार मारले गेले. विरोधक अविश्वास ठरावावर नो-बॉलिंग करत आहेत. इथून शतकं झळकावत आहेत.’