राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठपका ठेवत शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतच पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल भूमिका मांडली आहे.
या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, 'आता संघटनेसाठीचा पुढचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेते देतील. राज्यात पाऊस चांगला सुरु आहे. पर्जन्यकाळ संपल्यावर आपल्याला जोमाने काम करायचे आहे. पुढचे अडीच वर्ष जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, संघटना बळकट करणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे यासारखी कामं करायची आहेत.'
'सुदैवाने आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याकडे आहे. तरीही लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल,' असं सांगत शरद पवारांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना कुणाची, शिवसैनिक कुणाच्या बाजूने असेही प्रश्न चर्चिले जात आहेत. शिवसेनेतील बंडखोरीच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी या बैठकीत भाष्य केलं.
'मी दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक मला भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत,' असं पवार म्हणाले.
'अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल,' असं सांगत शरद पवारांनी शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला.
'राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो. सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना व जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला,' असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
'अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे,' असं शरद पवार या बैठकीत म्हणाले.