Balu Dhanorkar : …अन् त्या व्हायरल कॉलने काँग्रेसला महाराष्ट्रात दिला एकमेव खासदार
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. अशोक चव्हाण यांचा एक कॉल व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव धानोरकरच निवडून आले होते.
ADVERTISEMENT

Balu Dhanorkar News : बाळू धानोरकर अशोक चव्हाणांच्या व्हायरल झालेल्या एका फोन कॉल संभाषणामुळे खासदार झाले! खासदार धानोरकरांच्या अकाली निधनानंतर हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यामुळेच आपण चार वर्षांपूर्वी म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी नेमकं काय घडलं होतं? ऑडिओ क्लिपमध्ये चव्हाणांनी काय म्हटलं आणि काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणी तिकिटांमध्ये कसा फेरबदल झाला, यावर टाकलेला हा प्रकाशझोत
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं मंगळवारी 30 मे रोजी अकाली निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. किडनीशी संबंधित आजारामुळे धानोरकर यांना नागपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्येत आणखी बिघडल्यामुळे धानोरकरांना एअर अम्ब्यूलन्सने दिल्ली हलवण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालावली.
शिवसेना ते काँग्रेस… धानोरकर कसे बनले खासदार?
बाळू धानोरकर हे एकवेळा आमदार आणि एकवेळा खासदार राहिलेत. एक शिवसैनिक ते काँग्रेस खासदार असा धानोरकरांचा प्रवास राहिलाय. 2014 मध्ये ते वरोरा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले.
काँग्रेसमधून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कन्फर्म झाल्यामुळेच धानोरकरांनी शिवसेनेला रामराम ठोकला. पण ऐनवेळी धानोरकरांऐवजी तिकीट माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना मिळालं. यानंतरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू घडल्या.










