’16 आमदार अपात्र झाले, तर…’, अजित पवारांनी केली बेरीज अन् सांगितला बहुमताचा आकडा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. यावर अजित पवारांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल येण्याआधीच महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाले आहेत. 2019 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडींप्रमाणे राज्यात भूकंप होऊ शकतो, या चर्चेंनं वेग धरला आहे. त्यातच अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या बातमी समोर आली. त्यामुळे अजित पवारांच्या मनात चाललंय काय? या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेला आज अजित पवारांनी उत्तर दिलं. यावेळी पवारांनी आमदारांची गोळाबेरीज करत बहुमताचा आकडा कसा असेल, हेही स्पष्ट केलं.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असून, त्यामुळे विद्यमान सरकार अस्थिर आहे, अशी चर्चा होतेय आणि महाराष्ट्रात नवीन समीकरण आकाराला येईल, असंही बोललं जात आहे, अजित पवार यांना नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, “सगळे असं अंदाजाने व्यक्त करत आहेत. आज एक वर्ष होत आलं… म्हणजे मे महिना संपल्यानंतर एक वर्ष होईल ही घटना घडून (एकनाथ शिंदेंचं बंड) आता एक वर्षांपासून आपण म्हणतोय की, सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे, निकाल लागेल. निवडणूक आयोगाने तर पक्षाचा आणि चिन्हाचा निकाल दिला. तो निकाल दिल्यानंतर काहीजण कोर्टात गेले परंतु निवडणूक आयोग ठरवत असतो की, चिन्ह कुणाला? पक्ष कुणाला? तो त्यांनी केलेला आहे.”
हेही वाचा >> राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? शरद पवारांचं सूचक विधान, राऊतांनी सांगितली बैठकीतील स्टोरी
“दुसरी बाब म्हणजे सर्व बाजूच्या वकिलांनी आपापली भूमिका सुप्रीम कोर्टासमोर स्पष्टपणे मांडली आहे. सगळा महाराष्ट्र, ज्यांना राजकारणात रुची आहे, असे देशातील लोकांना वाटतं की, या गोष्टीचा निकाल कसा लागणार? त्यामुळे सगळे त्या निकालाकडे लक्ष देऊन आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
16 आमदार अपात्र झाले, तर बहुमताचं समीकरण बदलणार, पण सत्ता भाजपची…? अजित पवार काय म्हणाले?
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले, “प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत आहेत. 16 लोक अपात्र होतील. त्यानंतर काही प्रश्न निर्माण होतील. मी आपल्याला सांगतो की, आता अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 भाजप आणि 9 अपक्ष असे. आणि एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले 40. त्यांच्याकडील अपक्ष बाजूला ठेवा, कारण अपक्ष हा विचार करतात की, ज्यांचं सरकार येईल त्यांच्याबरोबर. त्यामुळे 40 आणि 115 असे 155 झाले.”