Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत जवळपास प्रत्येक नेत्याने एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा केली, पण हीच भूमिका सगळे नेते किती काळ पुढे लावून धरतात, हे पाहावं लागेल.
ADVERTISEMENT

Opposition Alliance 2024 : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) समोर मोठं आव्हान उभं करण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीत 15 पक्षांमध्ये प्राथमिक सहमती झाली. दुसरी बैठक १२ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे होणार आहे.
विरोधी पक्ष एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा करत आहेत, पण अरविंद केजरीवालांपासून ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादवांपर्यंत प्रत्येकाचा आपापला अजेंडा आहे. काही मुद्द्यांवर आमच्यात मतभेद असले तरी आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले. राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत जवळपास प्रत्येक नेत्याने एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा केली, पण हीच भूमिका सगळे नेते किती काळ पुढे लावून धरतात, हे पाहावं लागेल.
आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसने पाठिंबा न दिल्यास शिमला बैठकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्याची तिथे जास्त ताकद आहे, त्याने तिथे लढावे. त्यामुळे साहजिकच सर्वांना एकत्र आणणे हे नितीशकुमार यांच्यासाठी कठीण काम असणार आहे. त्यांचे गुरू जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे किंगमेकरची भूमिका यशस्वीपणे पेलण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आणि त्यामुळेच हे आव्हान त्यांना पेलणार का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांना पेलले होते मोट बांधण्याचे शिवधनुष्य
विविध विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये एकमत निर्माण करणे हे विरोधी ऐक्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान आहे. स्वत:च्या अजेंड्यावर चालणाऱ्या पक्षांना समान अजेंड्यावर एकत्र आणून काम करायला तयार करणे हे अवघड काम आहे. मात्र, जॉर्ज फर्नांडिस यांनी तसे करून दाखवून दिले होते. त्यावेळी एनडीएचा समान अजेंडा तयार करण्यात आला आणि भाजपने आघाडीसाठी आपले प्रमुख मुद्दे सोडले, राम मंदिरापासून ते जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यापर्यंत.