धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत सर्वात मोठी अपडेट, पाहा सरकारने CJP ला नेमकं सांगितलं तरी काय
Cockroach Janta Party Protest: नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांवरून झुरळ जनता पक्षाचे आंदोलन सुरूच आहे. तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक पार पडली. पाहा या बैठकीत नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: झुरळ जनता पक्षाने (CJP) आज देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे थोड्याच वेळापूर्वी CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा पार पडली. या चर्चेत नेमकं काय घडलं हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.
सोनम वांगचुक यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण मागे घेतलं. तब्बल 26 दिवस त्यांचं उपोषण हे सुरू होतं. मात्र, असं असलं तरी सीजेपीने एक गोष्ट स्पष्ट केली की, जोवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. दुसरीकडे सरकारने सीजेपीला अनेक मुद्द्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारची काय भूमिका?
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये CJP आणि सरकारी प्रतिनिधी मंडळांमध्ये बैठक पार पडली. ज्याचे फोटोही समोर आले आहेत. CJP प्रतिनिधी मंडळात सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचा समावेश होता. तर सरकारच्या बाजूने जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये CJP आणि सरकार यांच्यातील ही बैठक अंदाजे 50 मिनिटे चालली.
हे ही वाचा>> Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
ज्यानंतर CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सांगितले की, मंत्र्यांसोबतची बैठक अंदाजे 10 मिनिटे चालली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या तीन मागण्यांपैकी दोन मागण्यांवर सरकार सकारात्मक दिसत आहे. सौरभ दास यांच्या मते, बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक आहे. शिवाय, आंदोलकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या मुद्द्यावरही सरकार सकारात्मक दिसले.
