जयंत पाटलांचं कौतुक, ठाकरेंनी सगळा इतिहासच काढला! ‘सामना’तून पुन्हा ‘वार’
जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांच्या याच चौकशीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवर बोट ठेवलं आहे.
ADVERTISEMENT

Political News of Maharashtra : ‘पाटला-पाटलांतला फरक’, या शीषर्काखाली लिहिलेल्या अग्रलेखातून सामनाचे संपादक असलेल्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर ‘वार’ केला आहे. जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांच्या याच चौकशीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवर बोट ठेवलं आहे. सचिन वाझे, परमबीर सिंग, समीर वानखेडे या वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांबरोबरच किरीट सोमय्या, दादा भुसे, प्रविण दरेकर यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात भूमिका मांडताना म्हटलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची मंगळवारी ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. या काळात जयंतरावांनी एक पुस्तक वाचून संपवले. आयएएल अॅण्ड एफएस या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या कथित घोटाळय़ाप्रकरणी ईडीला अधिक माहिती हवी आहे व त्यासाठी जयंत पाटील यांना पाचारण केले. ही माहिती ते लेखी स्वरूपातही मागवू शकले असते, पण एकदा त्रास द्यायचा म्हटलं की, सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. ज्या प्रकरणात जयंतरावांना बोलावले तो काय प्रकार आहे? पण ‘घोटाळा घोटाळा’ म्हणून भुई बडवली जात आहे. या कथित घोटाळ्याशी संबंधित राजकारणी भाजप परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाहीत. तो मान फक्त भाजपपुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा.”
भाजपमध्ये गेल्यावर सुखाने झोप
अग्रलेखात पुढे म्हटलं आहे की, “जयंत पाटील दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. ते हसतमुख होते व त्या रात्री त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय माणसेही शांत झोपतात. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत व त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की, ‘मला आता शांत सुखाने झोप लागते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती आता अजिबात नाही. कारण मी दाराला भाजपचे कडीकोयंडे लावले आहेत!’ सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनासुद्धा सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेच. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडी वगैरेंचे बालंट टळले आहे. शिवसेनेचे 40 आमदार ईडी, सीबीआयच्या भयाने उंदरासारखे पळाले. त्यापैकी अनेकांवर चौकश्यांचे समन्स व अटकेचे वॉरंट होते. पक्षांतर करताच भाजपने त्यांना ईडीपासून अभय दिले, पण जे भाजपच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांसारखे नेते ईडी कारवाईचे बळी ठरले.”
हेही वाचा >> MVAचा जागा वाटपाचा तिढा सुटला? नाना पटोलेंनी ‘मुंबई Tak’वर सांगितला फॉर्म्युला
“जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे. नवाब मलिक यांच्यावरचे गुन्हेदेखील खोटे ठरतील अशी आता स्थिती आहे”, असं भाष्य अग्रलेखातून करण्यात आलं आहे.