सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी पवार कुटुंबात काय घडलं?, रोहित पवारांचा गौप्यस्फोट
अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण याचविषयी आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं वातावरण ढवळून गेलं. पण या सगळ्यातलं सुनेत्रा पवारांच्या मौनामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. मुंबई Tak चावडी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मात्र एक कुटुंबातला सदस्य म्हणून काही प्रश्नांची उत्तरं देऊन नव्या चर्चेला तोंड फोडलंय. अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ ही देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेली, मात्र खरोखर तो निर्णय सुनेत्रा पवार यांचा होता का? की त्यांच्यावर कोणी दबाव टाकला? सुनेत्रा पवार यांनी याबाबत पवार कुटुंबासोबत काही चर्चा केली का? या सगळ्यावर रोहित पवार चावडीवर काय म्हणालेत सविस्तर वाचा.
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आणि पवार कुटुंबाबात रोहित पवार काय म्हणाले?
प्रश्न- अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 2 दिवसात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तुम्हाला त्याचं आश्चर्य नाही वाटलं? तुमच्या सर्व आरोपांमध्ये ही क्रोनोलॉजी राहते
रोहित पवार: एक परिवार म्हणून आम्ही नाराज होतो, पण काकींना पण हे नव्हतं करायचं. पण साहेब, ताई आणि आमच्या मनात नव्हतं पण भीती अशी घातली गेली की उद्या जाऊन जर हा पवार साहेबांच्या हातात हा पक्ष आला तर या पटेल आणि तटकरेंना बाहेरच काढलं जाईल, पण सुनेत्रा काकींनाही न्याय मिळणार नाही अशी भीती घातली गेली.
हे ही वाचा>> अजितदादा भाजपसोबतची सत्ता सोडणार होते?, मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ
काकी सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहेत, पण राजकीय क्षेत्रात नवीन आहेत. दादांच्या अवतीभोवती असणारे जे मोठे नेते आहेत ते सगळेच काकींना सांगत असतील की करावंच लागेल अन्यथा काहीतरी होईल, तर अशात काकींची बाजू कमजोर पडली. पतीच्या निधनाचं दु:ख आणि महिला जास्त भावनिक असतात अशात त्यांनी चौथ्या दिवशी शपथविधी केला.
प्रश्न- त्यांच्यावर दबाव आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एक कुटुंब म्हणून तुमच्या कोणाशीच सुनेत्रा पवारांनी चर्चा केली नाही?
रोहित पवार: आम्हाला वाटलं होतं की, 13 दिवसांचं कार्य होईल पण तिसऱ्याच दिवशी ते विधी झाले. अजितदादांच्या मृत्यूने पवारसाहेब मानसिकदृष्ट्या खचले होते. दादांच्या कुटुंबाकडून आम्हाला काही त्यांनी सांगितलं नाही पण तिसऱ्या दिवशी विधी झाले. आम्हाला सगळं टीव्हीवरून कळलं, पवार साहेबांसोबत काहीच चर्चा झाली नाही, कदाचित सुनेत्रा काकींनाही अंदाज नसावा पण काही लोकांच्या दबावाखाली येऊन तो निर्णय घेतला असावा. सुनेत्रा काकींनाही हा प्रकार आवडला नाही, आमच्या कुटुंबातही हे कोणाला आवडलं नाही. माझं हे नाही म्हणणं की त्यांना उपमुख्यमत्रिपदाची शपथ घ्यायची नव्हती, पण ती चौथ्या दिवशी घ्यायची नव्हती, तेराव्या दिवसानंतर नक्कीच घ्यायची होती.









