आता मशालीची धग सहन करा! : बाळासाहेबांनी भाजपला ३७ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा

भाग्यश्री राऊत

एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला आणि आता शिवसेनेचे दोन गट पडले. एक ठाकरेंचा गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिंदेचा गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. ठाकरेंना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली असं आवाहनही शिवसैनिकांना केलं जातं आहे. पण, अशातच बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं ३७ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल होतं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला आणि आता शिवसेनेचे दोन गट पडले. एक ठाकरेंचा गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिंदेचा गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. ठाकरेंना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली असं आवाहनही शिवसैनिकांना केलं जातं आहे.

पण, अशातच बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं ३७ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल होतं आहे. यामध्ये मशाल हाती धरून बाळासाहेब भाजपला इशारा देताना दिसतात. आता भाजप आणि सेनेमध्ये आताचा वाद तर आपल्याला नवीन नाही. पण, त्यावेळी असं काय झालं होतं की बाळासाहेबांनी इतक्या कठोर शब्दात भाजपला इशारा दिला होता? मशाल हातात धरून बाळासाहेबांनी भाजपला काय म्हटलं होतं? हे पाहणं गरजेचं आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हे व्यंगचित्र शेअर केलं. त्यानंतर ते व्हायरलंही झालं. या व्यंगचित्रात एका बाजूला शिवसेना कमळ हातात घेतलेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना हातात मशाल घेऊन दिसते. कमळ हातात घेतलं तेव्हा सुखावलात, आता मशालीची धग सहन करा, असा इशारा बाळासाहेब या व्यंगचित्रातून भाजपला देताना दिसतात. आम्ही अधिक माहिती घेतली असता, बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र १९८५ मध्ये काढलं होतं. पण, बाळासाहेब १९८५ मध्ये भाजपविरोधात इतके आक्रमक का झाले होते?

तर त्याचं झालं असं, १९८४ ला भाजप आणि सेनेची पहिल्यांदा युती झाली. त्यावेळी शिवसेनेकडे त्यांचं अधिकृत असं चिन्हं नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांचे दोन उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उतरवले होते. एक होते मनोहर जोशी आणि दुसरे वामनराव महाडीक. पण, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे या भगव्या युतीचा टीकाव लागला नाही आणि युतीचे उमेदवार मोठ्या फरकानं पराभूत झाले. त्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत युती नको, असा निर्णय घेतला. शेवटी भाजप-सेनेची युती तुटली.

त्यानंतर १९८५ ची विधानसभा निवडणूक लागली. यात भाजपनं शरद पवारांसोबत युती केली होती. शिवसेनेनं ४५ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. पण, सेनेकडे चिन्हं नव्हतं. आता जे उद्धव ठाकरेंना मिळालेलं मशाल चिन्ह आहे, तेच मशाल चिन्ह त्यावेळी शिवसेनेला मिळालं होतं. यावेळी प्रचार सभांमध्ये बाळासाहेबांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘कमळाबाईसोबत आम्ही संसार थाटला होता. पण, कमळाबाई शरद पवारांवर डोळा मारत होती. कमळाबाई आम्हाला सोडून गेली’, असा टोला बाळासाहेबांनी लगावला होता. आता जे हातात मशाल घेतलेलं व्यंगचित्र व्हायरल होतं आहे ते बाळासाहेबांनी याच काळात काढलं होतं. युती तोडल्यामुळे बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला होता.

१९८५ च्या या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने बाजी मारली. शिवसेनेनं ४५ निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यावेळी शिवसेनेचा एकमेव उमेदवार निवडून आला होता. ते उमेदवार म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांचं चिन्ह होतं मशाल. आता हेच मशाल निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं आहे. आता या चिन्हावर ठाकरेंना किती यश मिळतं हे आपल्याला येत्या अंधेरी पोटनिवडणुकीत पाहावं लागेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp